- लोणावळा नगर परिषदेच्या वतीने कडक पावले
लोणावळा – पर्यटननगरी लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लोणावळा नगर परिषदेच्या वतीने कडक पावले उचलत पाच दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटननगरी शनिवार (दि. 24) ते बुधवार (दि.28) या पाच दिवस कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाने कडक लॉकडाऊन लागू करूनही नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. उपाय म्हणून राज्य शासनाने घोषित केलेल्या संचारबंदीला देखील वाटाण्याच्या अक्षता लावून नागरिक मोठ्या संख्येने सर्वत्र मुक्तसंचार करताना सर्रास दिसत आहेत. केवळ लोणावळा शहराचा विचार केल्यास याठिकाणी मागील काही दिवसांपासून सातत्याने 40 ते 50 करोना रुग्ण आढळून येत आहे. तर दररोज 3 ते 4 जणांचा मृत्यू होत आहे.
लोणावळा शहरात करोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाला पायबंद घालण्यासाठी गुरुवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पोलीस निरीक्षक दिलीप पवार, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, आरोग्य सभापती रचना सीनकर, पाणी पुरवठा सभापती सुधीर शिर्के, शिक्षण समिती सभापती ब्रिंदा गणात्रा, कॉंग्रेस गटनेत्या आरोही तळेगावकर, नगरसेवक राजू बच्चे, निखिल कवीश्वर, विशाल पाडाळे, उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे तसेच नगर परिषदेच्या सर्व विभागाचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना सर्व जबाबदारी नगरपरिषद प्रशासनावर सोडून मोकळे होणारे तहसीलदार, प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण काळात एकदा तरी लोणावळा शहराला भेट देऊन येथील आढावा घेतला का असा प्रश्न नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी उपस्थित करीत शरसंधान साधले. त्यांच्या या प्रश्नाला इतर नगरसेवकांनी देखील दुजोरा दिला. लोणावळा नगरपरिषद कोविडग्रस्तांसाठी संपूर्ण ताकत लावून काम करीत असताना शासनाने तसेच आरोग्य विभागाने देखील आवश्यक ती सर्व मदत नगरपरिषदेला करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
याबैठकीत कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या स्तरावर कोणकोणत्या उपाययोजना आखता येईल यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तद्नंतर काही निर्णय घेण्यात आले आणि सदर निर्णयांची अंमलबजावणी शनिवारी (दि. 22 ते 24) अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.