Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. मात्र त्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. लोणावळ्यात मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. मात्र यावरून आता जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“लोणावळ्यात मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान ठेवतो, त्यामुळे मी सही केली. त्यात एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता. माझ्यासह इतर नऊ जण असल्याचं सांगत फसवून सही घेण्यात आली. या सहीचा दुरुपयोग कुणी केला तर गाठ माझ्याशी आहे,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांना आझाद मैदानाची परवानगी नाकारली आहे. आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानात आंदोलक पोहचू लागले आहे.
मराठा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्रातील ठिकठिकाणांवरुन मराठा बांधव आझाद मैदानात यायला सुरवात झाली आहे. आज सकाळी त्यांनी झेंडा वंदनही केलं. ज्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही काही वेळात सरकारच्या शिष्ट मंडळांशी चर्चा करणार असल्याचे म्हंटले आहे.
सरकारचं शिष्टमंडळ आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी वाशीमध्ये पोहोचलं आहे. शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सरकारच्या मसुद्यासंदर्भात चर्चा होणार आहे. शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत.