मुंबई – आज सत्याचा विजय झाला. सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे. कायदेशीर बाबी आणि तांत्रिक बाबी देवेंद्रजींनी सांगितल्या आहेत. देशात संविधान आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. सरकार कायदेशीर बाबींची पूर्तता करून सरकार स्थापन केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो, अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल चढवला. न्यायालयाच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सोबत उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले की, अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण दिला. आम्ही बहुमताचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला. त्यांच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही जनभावनेचा आदर केला. शिवसेना-भाजप सोबत लढले दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले. बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने आज केला आहे.
लोकशाही व लोकमताचा विजय -फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे. त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. निश्चितपणे हा लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्ण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे, यातील 4 ते 5 मुद्द्यांकडे मी आपले लक्ष वेधणार आहे. महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर कोर्टाने पाणी फिरवले आहे. ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने अतिशय स्पष्टपणे अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असे सांगितले आहे. अशाप्रकारे कोर्टाने या आमदारांचे सर्व अधिकार कायम ठेवलेले आहे.