पुणे – भक्ती आणि आनंदाचा ठेवा घेऊन येत शहरात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता उद्या अनंत चतुर्दशीला होत आहे. करोना साथीमुळे गेले दीड वर्ष त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या आयुष्यात या उत्सवामुळे नवीन पहाट आली होती.
मंगलमय आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात दहा दिवसांपासून घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पांचा मुक्काम आहे. प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीला गणरायांना निरोप देण्यात येतो. दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात आणि गणरायाच्या नामघोषात विसर्जन मिरवणुकीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जगभरातून अमाप गर्दी लोटत असते. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा आणि मिरवणुका रद्द करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला.
त्यानुसारच यंदाचा गणेशोत्सव पार पडला. देखावे आणि रोषणाईसाठी प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांनी साधीच विद्युत रोषणाई आणि पुष्प सजावट केली. अनेक मंडळांनी रोषणाईवरील खर्चाऐवजी रक्तादान शिबिर, लसीकरण शिबिर आदी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली.
शहरातील मानाच्या गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आदर्श निर्माण करतात. सलग दोन वर्षे डामडौल टाळत उत्सव साजरा करण्याचा नवा पायंडा पाडला असून, मंडळांच्या या भूमिकांचे स्वागत देखील सर्व स्तरांतून झाले; परंतु सलग दुसऱ्या वर्षी साधेपणानेच उत्सव साजरा करावा लागत असल्याने गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये काहीसे हिरमुसलेपण कायम होते.
वाद्य यंदाही कुलूपबंद
मिरवणूक आणि आसमंतात घुमणारे ढोल-ताशांचे आवाज हे समीकरण पाहायला मिळते. मिरवणुकांच्या एक दिवस अगोदरच वादकांकडून ढोल-ताशांची बांधणी, ध्वज तयार ठेवणे, वादनाचे साहित्य सज्ज ठेवणे अशी तयारीची लगबग सुरू असते. मात्र करोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मिरवणुका रद्द झाल्याने यंदाही वाद्ये कुलूपबंदच आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेडस नाही
दिमाखदार विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशीच सायंकाळपासूनच लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, मध्यवर्ती भागात पेठा, स्वारगेट, डेक्कन या भागांतील गल्ल्यांमध्ये देखील पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात येते. विसर्जनाच्या दिवशी मध्यवर्ती भाग बहुतांश व्यवहार बंदच असतात. मात्र यंदा अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला खुले आणि वर्दळ असणारे रस्ते पाहून पुणेकरांमध्ये दोन वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवाची चर्चा करण्यात येत होती. तर “जल्लोषी’ वातावरणाला मुकलो असल्याची भावना देखील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती.
सध्याचे वाहतुकीचे निर्बंध रविवारी कायम
मागील दहा दिवसांपासून केवळ शहराच्या मध्यवर्ती भागात आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल करण्यात आले. हेच निर्बंध रविवारी देखील कायम राहणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दीच्या ठिकाणी असणारे बॅरिकेडिंग कायम ठेवण्यात येणार आहे. तर गरजेनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागांच्या अधिकाऱ्यांनी दिली.