मुंबई – भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना मोलाचा सल्ला दिला आहे. ‘लग्नाची पत्रिका असो नसो, लोकांच्या लग्नाला जा’ असा सल्ला बागडे यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील सात हजाराहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल 20 डिसेंबरला जाहीर झाले. त्यानंतर आता नवनिर्वाचित सरपंचांना बागडे यांनी हा मोलाचा सल्ला दिलाय.
भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पक्षाकडून औरंगाबादच्या संत एकनाथ रंग मंदिर नाट्यगृहात सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बागडे यांनी आपला राजकीय अनुभव सांगत नवनिर्वाचित सरपंचांना महत्वाच्या गोष्टी समजून सांगितल्या. तसेच राजकीयदृष्ट्या मोलाचे सल्लेही दिले.
नवनिर्वाचित सरपंचांना सल्ला देताना बागडे म्हणाले की, लग्नाची पत्रिका आहे की नाही याची चिंता न करता लोकांच्या लग्नाला जात जा, नवरीकडील लोकांना वाटेल नवरदेवाकडून पत्रिका असेल आणि नवरदेवाकडील लोकांना वाटेल नवरीकडील पत्रिका असेल. त्यामुळे लग्नाला जा, अनेक लोकं तुम्हाला तिथे पाहतात.
तसेच यावेळी पत्रावळ उचलू नका, पण नुसते वाका म्हणजे तुम्हाला वाकलेलं पाहून लोकं पत्रावळी उचलण्यासाठी येतील आणि लोकांना तुम्ही देखील वाकलेले दिसाल, असा सल्ला बागडे यांनी यावेळी दिला. त्यांच्या या हटके सल्ल्याची यावेळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली. राजकारण करत असताना लोकांची मने कशी जिंकायची याचे उदाहरण यावेळी बागडे यांनी दिले.