ल्हासा – चीनच्या घुसखोरीविरुद्ध तिबेटनेही आता आवाज बुलंद केला असून गुरुवारी कोलकाता स्थित चीनच्या दूतावासाबाहेर तिबेटी नागरिक आणि भारतीय नागरिकांनी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.
सेंट्रल तिबेट ऑर्गनायझेशनचा एक भाग म्हणून इंडो-तिबेट समन्वय कार्यालय यांच्या नेतृत्वाखाली, तिबेट आणि भारतीय झेंडे फडकवत आंदोलकांनी निषेध केला. यावेळी आंदोलकांच्या हातात दलाई लामा यांचे फोटोही होते.भारताने स्वतंत्र तिबेटला मान्यता द्यावी अशी आमची इच्छा आहे.
हा एक स्वतंत्र देश होता आणि जगाचं छप्पर नावाने ओळखला जाणाऱ्या या देशावर पीएलएकडून ताबा मिळवण्यापर्यंत भारत आणि चीन यांच्यात बफर स्टेटची भूमिका निभावत होता असे जिग्मे त्सुलत्रिम यांनी म्हटले आहे. तिबेटींना अधिकृतपणे निर्वासितांचा दर्जा देण्यात यावा तसेच दलाई लामा यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.
उल्लेखनीय म्हणजे, ल्हासा इथं झालेल्या चिनी हल्ल्याच्या विरोधात 1959 मध्ये तिबेटीय नागरिकांनी याच दिवशी शांततामय मार्गाने चीनचा निषेध नोंदवला होता. या निषेधाच्या वर्धापन दिनाला ठिकठिकाणी ही आंदोलने करण्यात आली. चीनच्या या हल्ल्यामुळे दलाई लामा आणि त्यांच्या असंख्य अनुयायांना पळून जाऊन भारतात आश्रय घ्यावा लागला होता. लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी लष्करी घुसखोरीच्या वाढत्या घटनांचा संदर्भ देताना, आशियातील दोन महासत्तांमध्ये बफर स्टेटची आवश्यकता गरजेची असल्याचे रुबी मुखर्जी यांनी म्हटले आहे.
भारताने तिबेट प्रकरणी देखरेखीसाठी एका मंत्र्याची नियुक्ती करण्याबद्दल विचार करावा, असा सल्लाही मुखर्जी यांनी यावेळी दिला.दरम्यान, कुल्लू जिल्ह्यातही तिबेटीय नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी आवाज उंचावला. तिबेटीय समुदायाच्या हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत चीनविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.