नवी दिल्ली – ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण दुर्घटना प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांना आज अटक केली. सेक्शन इंजिनिअर अरूण कुमार महंतो, सिनिअर सेक्शन इंजिनिअर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
2 जून रोजी बहनगा रेल्वे स्थानकाजवळ स्टेशनवर उभ्या असलेल्या एका मालगाडीला कोरोमंडल एक्स्प्रेस धडकून झालेल्या अपघातात 292 जणांचा मृत्यू तर 1 हजारपेक्षा जास्त जण जखमी झाले होते. बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसलाही या दोन गाड्यांच्या अपघाताची झळ पोहोचली होती.
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. रेल्वेनेही एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. चुकीच्या सिग्नलमुळे अपघात झाल्याचे समितीला आपल्या तपासात आढळून आले आहे.
रेल्वे सुरक्षा आयोगाकडून रेल्वे बोर्डाकडे चौकशीचा अहवाल देण्यात आला असून त्यानुसार सिग्नल यंत्रणेतील त्रुटी असली तरी जर बहानगा रेल्वे स्थानकाच्या व्ययवस्थापनाने एस अँड टी कर्मचाऱ्यांना वारंवार असामान्य असे काहीतरी दिसत असल्याच्या सूचना दिल्या असत्या तर त्यांच्याकडून काही पावले उचलली गेली असती असे नमूद केले आहे.