राजेंद्र गिरमे : माळी शुगरचा 86 वा बॉयलर अग्निप्रदीपन थाटात
अकलूज- साखर कारखाना चालवत असताना अनेक अडथळे, अडचणीचा मुकाबला करत सासवड माळी शुगर फॅक्टरीने यंदा 86वे वर्ष पूर्ण केले आहे. शेतकरी, कामगार, सभासद, संचालक, हितचिंतकांच्या विश्वासामुळे कारखाना सद्यस्थितीत सुस्थितीत चालत आहे. याचमुळे यंदा कारखाना 3 ते 3.5 मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष ठेऊन चालणार असल्याचे प्रतिपादन माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी केले. कारखाना कार्यस्थळावर 86व्या हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
गिरमे म्हणाले, कारखाना अडचणीत कसा येईल, तो बंद कसा पडेल, यासाठी आपल्याच लोकांकडून वारंवार प्रयत्न होत आहेत. परंतू कारखान्याची इतक्या वर्षीची यशस्वी परंपरा अजिबात खंडीत होणार नाही. शासनाला साखर उद्योगाविषयी अजिबात आस्था नसून साखरेचे दर, निर्मिती खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. साखर धंदा तोट्यात चालवावा लागत आहे. यंदा परतीचा पाऊस झाला नसता तर कदाचित पुढील हंगामात कारखाना सुरू करणे मोठे जिकिरीचे बनले असते. यावेळी बॉयलर अग्निप्रदीपन सेंट्रल बॅंकेचे शाखा अधिकारी ह्रषिकेश शिंदे, शेतकी अधिकारी सचिन नेवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर विजयकांत कुदळे, अरविंद जाधव, चेअरमन नंदकुमार गिरमे, व्हॉइस चेअरमन राहुल गिरमे, होलटाईम विलास इनामके, संचालक सतिश गिरमे, विशाल जाधव, परेश राऊत, यश बोरावके, शुगरकेन सोसायटीचे चेअरमन घनश्याम भोंगळे, माळीनगरचे सरपंच अभिमान जगताप, उपसरपंच संग्राम भोसले, कामगार प्रतिनिधी राजेंद्र होनमाने, बापू बनकर, अशोक कांबळे, विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र बधे यांनी केले. विलास इनामके यांनी आभार मानले.