बारामती येथे शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता लगावला टोला
बारामती- देशाचे सूत्र हाती असलेले नेते सत्तेचा गैरवापर करून “ईडी’च्या माध्यमातून तोंड बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु तुम्हाला काय करायचे ते करा? हा बारामतीकर तुम्हाला पुरून उरेल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी यांना लगावला.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अजित पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामती येथे झाली, त्यावेळी सभेत पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, विश्वास देवकाते, सदाशिव सातव, किरण गुजर, संभाजी होळकर, बाळासाहेब तावरे, सचिन सातव, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, आदी मान्यवर उपस्थित होते .
शरद पवार म्हणाले सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. कारखानदारी देखील अडचणीत सापडली आहे. हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. याबाबतची जबाबदारी सरकारने घेणे अपेक्षित आहे मात्र तसे होत नाही. सत्तेचा गैरवापर करत विरोधकांचा आवाज दाबले जात आहेत. शिखर बॅंक घोटाळा प्रकरणी कसलाही संबंध नसताना तक्रारदाराच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने माझ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. देशाची सूत्र हाती असणारे नेते पडद्यामागून अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. सरकार विरोधात आवाज उठवणाराचे तोंड बंद करण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अशा प्रकारचे आरोप पवार यांनी केले.
- …मग मतांची मागणी कशासाठी करतात?
राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची जरा देखील लाज सरकारला वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणतात निवडणुकीत दम नाही जर निवडणुकीत दम नसेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याच्या कानाकोपऱ्यात सभा घेऊन मतांची मागणी कशासाठी करत आहेत असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. - तरुण पिढी सत्तापरिवर्तनाच्या मुडमध्ये
यंदाची विधानसभेची निवडणूक तरुणांनी हाती घेतली आहे हे राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना लक्षात आले. तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुण पिढी सत्ता परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे तरुण पिढीला बरोबर घेऊन महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचा चमत्कार करू असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.