राहू – सत्ता परिवर्तन कशा पद्धतीने झाली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आता सत्तांतर होऊन देखील यांचे राजकारण हे सुरुच आहे. विकासकामात राजकारण न करता ते काम अविरतपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र, या शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रत्येक कामाला स्थगिती दिली जात आहे. महाविकास आघाडी काळात सरकारने घेतलेले निर्णय हे जनतेच्या हिताचे आणि विकासाचे आहेत. केवळ राजकीय स्वार्थासाठी “मविआ’च्या निर्णयाला स्थगिती दिली जात असल्याने हे सरकार स्थगिती सरकार असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
मिरवडी (ता. दौंड) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. अजित पवार म्हणाले की, युती सरकारने जी विकासकामे जाहीर केली होती त्या कामांना महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर ती स्थगित केली नव्हती, उलट निधीही कमी पडू दिला नव्हता;
परंतु महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कामाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. तसेच त्यामुळे काही सीमाभागातील गावांच्या कामांचा निधी थांबला. निधी थांबविल्यामुळे त्या गावांचा पायाभूत सोयीसुविधांवर मर्यादा आल्या त्यामुळे अनेक गावे अडचणीत आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यासपीठावरील मंडळींनी गडबड केली नाही पाहिजे
विकासकामे तसेच ग्रामपंचायत व सोसायटी, प्राथमिक शाळेचे प्रस्ताविक काम पाहून प्रभावित होऊन आशा काम करणाऱ्या माणसांची पक्षाला गरज आहे, असा दुजोरा अजित पवार यांनी दिला. मिरवडीचे सरपंच सागर शेलार व सदस्यांनी चांगले काम केले आहे, त्यामुळे सागर यांना भविष्यकाळात कोठे संधी द्यायची याचा पक्ष नक्की विचार करेल; परंतु हे बोलत असताना व्यासपीठावर नजर टाकून म्हणाले की फक्त व्यासपीठावरील मंडळींनी काही गडबड नाही केली पाहिजे, असेही विधान केले, त्यामुळे हे विधान कोणासाठी होते हे मात्र समजू शकले नाही.
चर्चेने मार्ग निघतो, किमान…
कर्नाटकातील मंत्री काहीही विधाने करत आहेत. त्या राज्यात आपल्या गाड्या फोडत आहेत. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मी बैठक घेतो, तर बोम्मई म्हणाले की, मी बैठकीला येणार नाही. तसेच एक इंचही जागा आम्ही महाराष्ट्राला सोडणार नाही. चर्चेला आल्याशिवाय मार्ग कसा निघेल, चर्चेने मार्ग निघतो. पण तुम्ही चर्चा तरी करायला या, असे आवाहन अजित पवार यांनी केले.