नांदूर – दौंड तालुक्यातील नांदूर (ता. दौंड) गावात भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. मागील काही महिन्यांपासून परिसरातील गावातील चोरीचे प्रमाण वाढले आहे. सध्या करोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडली असताना त्यांना भुरट्या चोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक वैतागले असून पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे बीट अमलदार पोलीस नाईक प्रमोद शिंदे हे चोरट्यांचा तपास सुरू आहे. गावातील सरपंच, सदस्य, पोलीस पाटील अन्य प्रमुखांना विचारात घेऊन आढावा बैठक घेण्यात येणार आहे. गावातील सरपंच, सदस्य तसेच प्रमुख पदाधिकारी, युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. तसेच गावामध्ये ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्री गस्ती सुरू आहेत, असे पोलीस पाटील नेहा बोराटे, धोंडीबा थोरात यांनी सांगितले.