नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली तरीही त्याचे अपयश झाकले जाणार नाही. त्यामुळे सरस खेळाडूंसाठी त्याचे संघातील स्थान धोकादायक ठरत आहे. त्यामुळे रहाणेला संघातून वगळलेच पाहिजे, असे मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
जोहान्सबर्ग कसोटीत रहाणेने अर्धशतकी खेळी केली असली, तरी केपटाऊन कसोटीत त्याच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे. रहाणे चांगला खेळला, यात दुमत नाही. पण भविष्याचा विचार केला विहारीची कामगिरी बघितली तर त्याला सुद्धा संधी मिळाली पाहिजे, असेही गंभीर म्हणाला.
कोहली संघात परतल्यानंतर विहारीला संघाबाहेर काढू नये. त्याने कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केले आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात विहारीने 40 धावा केल्या. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळाली पाहिजे, असे गंभीरने म्हटले आहे.
रहाणेशिवाय चेतेश्वर पुजाराबद्दलही गंभीरने त्याला वेळ दिला पाहिजे, असे सांगितले आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुजाराची कामगिरी चांगली आहे. पुजाराच्या कामगिरीची तुलना रहाणे बरोबर केली जाऊ शकत नाही. पुजाराला आणखी एका कसोटी मालिकेत संधी दिली पाहिजे, असेही गंभीर म्हणाला.