- फोटो व्हायरल करण्याचे प्रकार वाढले
- ब्लॅकमेलिंगच्या घटनांमध्येही वाढ
पिंपरी – पती-पत्नी आणि प्रियकर-प्रियसी यांच्यातील प्रेमाचे नाते तुटल्यानंतर एकमेकांवर कुरघोडीचा खेळ सुरु होतो. हा खेळ द्वेषाच्या इतक्या टोकाला जातो की, एकमेकांना बदनाम करण्यासाठी प्रेमाच्या दिवसात काढलेले “ते’ फोटो व्हायरल केले जातात. यातून एकाची बदनामी होते तर दुसऱ्यावर गुन्हा दाखल होतो आणि दोघांवरही पश्चाताप करण्याची वेळ येते. अशा घटना शहरात वारंवार समोर येत आहेत.
विनय आणि मेघना (नावे बदलली आहेत) यांचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर काही दिवस अगदी सुखात गेले. मात्र कालांतराने त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली. ती मन रमविण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत होती. त्यातून तिच्या चारित्र्याबाबत संशय निर्माण झाला. एकमेकांना धडा शिकविण्याची भाषा दोन्ही बाजूंनी होऊ लागली. दोघांनाही एकमेकांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटचे पासवर्ड माहीत होते. लग्नानंतर काढलेले काही फोटो पत्नीला धडा शिकविण्यासाठी त्याने सोशल मीडियावर टाकले. यातून पत्नीची बदनामी झाली तर पतीवर गुन्हा दाखल झाला.
फेसबूक , व्हॉट्सऍप , इंस्टाग्रामसह अन्य सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर मैत्री आणि प्रेम करणाऱ्यांमध्ये लॉकडाऊननंतर बरीच वाढ झाली आहे. अशा प्रेमप्रकरणांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींची मोठी संख्या आहे. ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थीदशेत असलेले युवा वर्ग स्मार्टफोनचा अतिवापर करीत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फ्रेंड्स आणि नवीन नाते जोडण्याचा ते प्रयत्न करतात. तरुण-तरुणी तर सोशल मीडियावर मिळालेल्या प्रियकरावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. यातूनच नव्या नात्यांचा जन्म होतो आणि सर्वाधिक महत्त्व ते नव्या नात्याला देतात.
छायाचित्रांचा अस्त्रासारखा वापर
एकमेकांशी चॅटिंग झाल्यानंतर लगेच प्रेमात पडलेल्यांची संख्या कमी नाही. प्रियकरासोबत फिरायला गेल्यानंतर प्रेमसंबंध प्रस्थापित करताना मोबाइलमधून फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह आवरत नाही. ब्रेक अप झाल्यानंतर त्याच व्हिडिओ आणि फोटोंचा पुन्हा अस्त्र म्हणून वापर करण्यात येत आहे. बऱ्याच घटनांमध्ये या छायाचित्रांच्या जोरावर ब्लॅकमेलिंग केल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. एखादी व्यक्ती ब्लॅकमेल होऊ लागले की हे प्रकार सातत्याने वाढत जातात.
याबाबत जागृत रहा
* सोशल मीडियावरील ओळखीवर त्वरीत विश्वास ठेवू नका
* नात्याची पारख करा, कुटुंबातील नाते जपा
* पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवावे, त्यांना पुरेसा वेळ द्या
* अल्पवयीन मुलांच्या वागणुकीतील बदलांवर लक्ष ठेवा
* पाल्यांचे मोबाइल वारंवार चेक करा
* ब्लॅकमेलिंग केल्यास वेळीच पोलिसांकडे धाव घ्या