नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरूवारी इंधन दरवाढ आणि शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही इंधन दरांच्या भडक्यावरून सरकारवर बरसले.
यूपीएच्या कार्यकाळात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्काचे दर जेवढे होते तेवढे करण्यात यावेत. त्यामुळे इंधन दरवाढीपासून जनतेला दिलासा मिळू शकेल. सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी नफेखोरी करत आहे. केंद्रीय कृषी कायदे तातडीने मागे घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.
एकीकडे देशाचा अन्नदाता (शेतकरी) अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर उभा आहे. तर दुसरीकडे अनियंत्रित, असंवेदनशील सरकार गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गाचे कंबरडे मोडण्यात व्यस्त आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती दिसत आहे, असे सोनियांनी एका निवेदनात म्हटले.
राहुल यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. सध्या प्रचंड विकास झालेला दिसतो तो पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत. इंधनांवर मोठा कर लादून सरकार जनतेला लुटत आहे. लूट करता यावी यासाठी सरकार त्या इंधनांना वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यास तयार नाही, असे राहुल यांनी म्हटले.