मुंबई – आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत 25 कामगार संघटनांचे अध्यक्ष यांनी आपल्या समस्या मांडल्या. यामध्ये सफाई कामगार, आरोग्य खात्याचे कामगार, माथाडी कामगार, घरकामगार, विडी कामगार, विक्रेते, रिक्षाचालक, यंत्रकामगार, ऊसतोड कामगार, स्थलांतरित कामगार, कंत्राटी कामगार इत्यादी संघटनांच्या समस्यांच्या समावेश होता. ही बैठक सकारात्मक झाली. राज्यामधील कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटले आहे.
असंघटीत कामगारांची नोंदणी आणि विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी तातडीने कार्यवाही करणार असून कामगार कल्याण मंडळाच्या अर्धवेळ कामगारांना नियमानुसार पगारात वाढ करण्यात येणार आहे. सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना महानगरपालिका आणि शासनात नियुक्त करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करून पगार वाढीसंदर्भात तातडीने निर्णय घेणार असल्याचं मंत्री, खाडे यांनी सांगितले आहे.
असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावर नोंदणी कार्यालय उभारण्यात येणार असून, या केंद्राअंतर्गत कामगारांना इतर सुविधाही पुरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येणार आहे. तसेच कामगार सुरक्षा विमा महामंडळ, कामगार कल्याण मंडळ, बॉयलर वर्कशॉप सुरू देखील करण्यात येणार आहे.