नवी दिल्ली -कर्णधार रोहित शर्मा कोणत्याही कारणास्तव उपलब्ध नसल्यास विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या लढतीसारख्या मोठ्या सामन्यामध्ये विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवायला हवे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षीही इंग्लंड दौऱ्याच्या पुढे ढकलण्यात आलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात रोहित उपलब्ध नसताना भारतीय संघ व्यवस्थापनाने कोहलीला संघाचे नेतृत्व करण्यास सांगायला हवे होते, असेही शास्त्री यांनी यावेळी म्हटले आहे. शास्त्री पुढे म्हणाले, “एवढ्या मोठ्या सामन्यासाठी मला रोहितने तंदुरुस्त हवे आहे. कारण तो कर्णधार आहे. पण कोणत्याही कारणामुळे तो खेळू शकला नाही तर भारतीय संघाने त्या दिशेने विचार करायला हवा. जेव्हा रोहितला दुखापत झाली तेव्हा मला वाटले की, आता विराटच कर्णधार असेल.
जर मी त्यावेळी प्रशिक्षक असतो तर मीही हेच सुचवले असते. मला खात्री आहे की राहुल (द्रविड)नेही असेच केले असेल. तरी मी त्याच्याशी बोललेलो नाही.’ विराटच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली होती. फाफ डू प्लेसिसच्या दुखापतीमुळे कोहली सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत आहे.
डू प्लेसिस हा “इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळत आहे. यावर शास्त्री म्हणाले, “मागच्या वर्षी त्याला ब्रेक हवा असल्याचे मी म्हटले होते. कारण जणू सर्व जगाचा भार त्याच्या खांद्यावर होता. परंतू आता ती ऊर्जा, आनंद आणि उत्साह परत आला आहे, जो पाहणे चांगले आहे.’