खडकवासला धरणसाखळी 17 टीएमसीवर
पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत शहराला पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमला आहे. प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 17.12 टीएमसी (59%) झाला. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
जुलै अखेरपर्यंत दडी मारलेल्या पावसाने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीकपातीची टांगती तलवार पुणेकरांवर होती. पण, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस पुणेकरांच्या मदतीला धावून आला आणि धरणसाखळी क्षेत्रांत जोरदार वृष्टी झाली. आता या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अधून मधून तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठयात होणारी वाढ कायम आहे. तर, खडकवासला धरण 93 टक्के भरले असून मुठा उजवा कालव्यातून 1 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जुलै संपला, तरी ओढ दिलेल्या पावसाने खडकवासला प्रकल्पात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन दिवस हा जोर कायम होता. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत खडकवासला- 1, पानशेत-4, वरसगाव-4, तर टेमघर धरणात 15 मिमी पावसाची नोंद झाली.
वरसगाव 55 टक्के भरले
खडकवासला धरणसाखळीतील सर्वांत मोठ्या वरसगाव धरणात 55% पाणीसाठा झाला आहे. या धरणाची साठवण क्षमता साडेबारा टीएमसी आहे. पानशेत-65% पाणीसाठा झाला आहे. या धरणाची क्षमता साडेदहा टीएमसीची आहे. तर खडकवासला- 93%, टेमघरचा पाणीसाठा 35% इतका नोंदवला गेला आहे.