संभाजीनगर, दि. 27 (वार्ताहर) – निगडी प्राधिकरण येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश तलाव उभारण्यात आला आहे. मागील तीन वर्षांपासून हा तलाव दुरवस्थेमुळे बंद आहे. तळ्यातील शेवाळयुक्त पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या तळ्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गणेश तलावामधील मागील तीन वर्षांपासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे तलाव गाळाने भरून गेला आहे. त्यामुळे तलाव परिसर दलदलयुक्त बनला आहे. तलावात असलेल्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर शेवाळ आले आहे. तसेच पाणी साचून राहिल्याने दूषित झाले आहे. तसेच तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणगवत वाढले आहे. त्यामुळे हा तलाव आहे की दलदलीचा प्रदेश की गवताळ प्रदेश असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. गवत पाण्यात सडल्याने आणि पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळ आल्याने तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच तलावाचे नैसर्गिक सौंदर्यास बाधा निर्माण झाली असून परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.
महापालिकेने या तलावासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.तसेच तलाव परिसरात उद्यान उभारले आहे. त्यामुळे निगडी आणि आजूबाजूच्या उपनगरामधून येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. तसेच उद्यानात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले येतात. परंतु तलावात गाळा साचून पाणी दूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे उद्यान परिसरात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात सुंदर आणि सुसज्ज परिसर म्हणून प्राधिकरणाकडे बघितले जाते. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने गणेश तलावाच्या परिसरात फिरण्यासाठी येतात. पण तलावात झालेली दलदल बघून निराश होतात. तसेच स्थानिक नागरिकांनी देखील महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.
गणेश तलावातील गाळ काढण्यासाठी निवेदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दोन महिन्यात निविदा राबवून गाळ काढून घेण्यात येईल. सध्या तलाव परिसरातील गवत काढून घेतले आहे. लवकरच गाळा काढून तलाव परिसर स्वच्छ
करण्यात येईल. – सतीश इंगळे, सह शहर अभियंता स्थापत्य विभाग.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर डेंगीचे रुग्ण सापडत आहेत. गणेश तलावात दूषित पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निसर्गरम्य असलेल्या गणेश तलाव व परिसरातील नागरिकांना डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. डेंगी, मलेरिया सारख्या आजारांना सध्या शहरातील नागरिक बळी पडत आहेत. येथील नागरिकांना देखील साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.