कोपरगाव – अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कोपरगाव रेल्वेस्थानकाच्या पुर्नार्विकास कामासाठी तब्बल 29 कोटी 94 लाख रुपये मंजूर झाले आहे. त्याचाही शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळे आता कोपरगाव रेल्वे स्थानकचा कायापालट होवून हे स्थानक अद्ययावत देखील होईल. यामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सोईसुविधा उपलब्ध होणार आहे.
रेल्वेस्थानकाच्या कामाचा शुभारंभ सोहळ्याला कोपरगाव येथील कार्यक्रमाला खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ अभियंता मोहम्मद फैज, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कैलास ठोळे, विठ्ठलराव लंघे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, महिला आघाडीप्रमुख विमल पुंडे, कोपरगाव रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापक बी. एस. प्रसाद आदींसह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
खा. लोखंडे म्हणाले की, घाटमाथ्यावरचे समुद्राला वाहुन जाणारे पाणी वळवले तर 115 टीएमसी पाणीसाठा वाढेल. विविध ठिकाणी बंधारे बांधले तर संपूर्ण नगर जिल्ह्यातील पाण्याची समस्या मिटेल व पिण्यास सिंचनासाठी मुकबल पाणी मिळेल. निळवंडेची लढाई आपण जिंकलेली आहे.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगाव रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. नव्या आराखड्यात त्या इतिहासाची जपणुक करावी. विमानतळासारखी अद्ययावत विद्युत व्यवस्था करावी. माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विमानतळाची निर्मिती होवून दुष्काळी भागाचा विकास झाला. कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईनचा सर्व्हे तातडीने पूर्ण करून या कामाला गती देणे गरजेचे आहे. या रेल्वे मार्गामुळे संपूर्ण दक्षिण भारत कोपरगावला जोडला जावून मतदार संघाचा अधिकचा विकास होणार आहे.
माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, घाटमाथ्यावरचे पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळवण्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे यांनी सतत पाठपुरावा केला. त्या कामाला गती मिळाली पाहिजे. सन 2005 साली झालेला समन्यायी पाणी वाटपाचा काळा कायदा जर रद्द करता आला तरच खऱ्या अर्थाने आपलं हक्काचं पाणी वाचणार आहे.