मुंबई – पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या पतधोरणात रिझर्व बॅंक भांडवल सुलभता कमी करण्याची शक्यता आहे. वाढलेली महागाई रोखणे गरजेचे असल्याचे यावरून दिसून येते.
रिझर्व बॅंक ज्या दरावर बॅंकाकडून ठेवी स्वीकारते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. रिव्हर्स रेपो रेट यावेळी पाव टक्क्यांनी वाढविण्याची शक्यता बार्कलेज या संस्थेने व्यक्त केली आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कर्जाची रक्कम
वाढविण्याचे ठरविले आहे. महागाई संदर्भात या संस्थेने म्हटले आहे की, जरी कच्च्या तेलाचे दर वाढले तरी भारतामध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत इंधनाच्या किमती वाढविल्या जाण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या दोन वर्षात लॉक डाऊनच्या काळामध्ये रिझर्व बॅंकेने व्याजदर कमी पातळीवर ठेवून भांडवल सुलभता वाढविली आहे. त्यामुळे देशात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. रिझर्व बॅंकेने या अगोदरच व्याजदरात वाढ करण्याची गरज होती असे बोलले जाऊ
लागले आहे. मात्र रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत तरी व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला नाही किंवा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त केलेली नाही.