सांगली – महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिप्पणी करणे यावर धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळते आहे. त्याचा परिणाम लोकांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते आज सांगली शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
आज देशाचे राजकारण एका वेगळ्या दिशेला जातेय आणि राज्य वेगळ्या विचारांच्या लोकांच्या हातात आहे. हा शिराळा तालुका आणि या सांगली, सातारा जिल्ह्यामधून कर्तृत्ववान नेतृत्वाची मालिका होऊन गेली. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू व अशी अनेक नावे आहेत. अशी अनेक कर्तृत्ववान माणसे तयार झाली त्यांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले.
लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील यादृष्टीने काम केले. या नेत्यांनी विकासाचे व माणसे जोडण्याचे राजकारण केले. आज मात्र देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे, गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला.
महाराष्ट्रासुध्दा गेल्या दोन वर्षांत एका वेगळ्या विचाराचे राज्य आले. जे पूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिले नव्हते. देशाला हेच चित्र दिसलं या सगळ्या कालखंडात सामाजिक ऐक्य या गोष्टी संबंधी वेगळी भूमिका मांडली गेली. काल परवा भाजपशासित कर्नाटक राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या दुकानातून मालाची खरेदी करू नका, अशा प्रकारचा फतवा काही संघटनानी काढला.
शेवटी व्यवसाय करायचा असेल तर दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुसंख्याक करु शकतो त्याचा व्यवसाय चांगला असेल, व्यवहार चांगला असेल, माल चांगला असेल तर त्याचा आदर करण्याची वृत्ती आपल्या समाजात आहे.
परंतु हा या जातीचा, हा या धर्माचा म्हणून तिथे मालच घेऊ नका याप्रकारची कटुता निर्माण करायचे काम जर राज्य हातामध्ये सत्ता असलेले घटक करू लागले, तर देश पुढे कसा जाईल? सामाजिक आणि राजकीय ऐक्य कसे ठेवायचे हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. आज या धर्मांध वृत्तीच्या विरोधात सुध्दा एकप्रकारची लढाई आपल्याला लढायची आहे, असे आवाहनही पवार यांनी केले.