सातारा -महाराष्ट्राच्या राजकारणात काही फडतूस अपप्रवृत्ती बोकाळल्या असून त्यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. या प्रवृत्तींनी इतके सवंग राजकारण केले आहे की त्याची पातळी पाहून त्यावर न बोललेलेच बरे, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांच्यावर केली.
येथील विश्रामगृहात नीलम गोऱ्हे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “आमदार नवनीत राणा यांच्या राजकीय उंचीबद्दल मी न बोललेलेच बरे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्तृत्ववान मुख्यमंत्री असून महाविकास आघाडीचा कारभार ते उत्तमरीत्या सांभाळत आहेत. मात्र, काही प्रवृत्ती सुपारी घेतल्या प्रमाणे बोलत आणि कृती करत असतात. नवनीत राणा यांचा राजकीय सवंगपणा उथळ स्वरूपाचा आहे. फडतूस माणसांविषयी न बोललेलेच बरे असते.’
साताऱ्यात नीलम गोऱ्हे दोन दिवसांपासून असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका त्यानी घेतल्या. बैठकांची माहिती देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “राज्यातील शाश्वत विकासासाठी शासनाने 500 कोटी रुपये निधी जाहीर केला असून करोना काळात ज्यांचे पालक दगावले आणि रुग्ण दगावले त्यांच्या मदतीच्या आढाव्यानुसार जिल्ह्यातील 849 एकल महिलांना तीन एकर शेतीकरता माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील चार धोकादायक पुलांना निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही राज्य शासनाकडे शिफारस करणार आहे.’ खासगी हॉस्पिटलमध्ये धर्मादाय हॉस्पिटलचा दर्जा असतानाही बिलामध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सवलतीचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या नोंदणी पोर्टलवर श्रमिक मजुरांची नोंद, अण्णासाहेब महामंडळ चर्मकार महामंडळ या महामंडळाना केंद्राच्या माध्यमातून भरघोस मदतीची शिफारस करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सहा कोटीची तर असंघटित क्षेत्रातील कामगारांना 70 कोटीची मदत झाली आहे. यामध्ये रिक्षाचालकांचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे नेते वैफल्यग्रस्त
नीलम गाऱ्हे म्हणाल्या, “महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सारं काही आलबेल सुरू असताना भाजप काहींच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांना टार्गेट करत आहेत. काही राजकीय नेते सुपारी घेतल्याप्रमाणे बोलत असून राज्यात भोंग्यांचा विषय नाहक राजकीय वळणावर आणून ठेवण्यात आला आहे.’ शिवसेनेला सत्तेतून पायउतार करायचे भाजपचे प्रयत्न अपयशी होत असल्याने त्यांचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाचे विधेयक देवेंद्र फडणीस यांच्या काळात तयार करून ते सादर करण्यात आले होते. त्याच्यामध्ये राजकीय मुद्देसूदपणा नसल्यानेच ते कोर्टात टिकले नाही. जे आपण करायचे आणि नाव दुसऱ्यावर घ्यायचे हे त्यांना शोभत नाही. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे संविधानिक मुद्दे आहे त्यावर विरोधकांनी कोणतेही आरोप केले तरी त्याला अर्थ प्राप्त होत नाही असा टोला त्यांनी लगावला.