- सासरी मन रमत नाही म्हणून उचलले पाऊल
पिंपरी – सासरी मन रमत नाही म्हणून एका नवविवाहितेने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचत कुटुंबीयांना चिंतेत तर पोलिसांना गोंधळून टाकले.तिला दोघांनी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून पुण्यातील सिंहगड रोडवर सोडून दरम्यान तिचे एक लाख 15 हजारांचे दागिने चोरले असल्याची फिर्याद तिने पोलिसात दिली. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात तिचा बनाव उघड झाला.
पिंपरी येथील एका 27 वर्षीय नवविवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिली होती. 20 मार्च रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात माहिती मिळाली की, साई चौक, पिंपरी येथे राहणा-या नवविवाहित महिलेला गुंगीच्या औषधाचा रुमाल लावून बेशुद्ध करून तिचे घरातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिचे एक लाख 15 हजारांचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन फ्रेंडशिप गार्डन सिंहगड रस्ता, पुणे येथे सोडण्यात आले.
पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी समांतर या गुन्ह्याचा तपास सुरु केला. फिर्यादी पोलिसांना वारंवार विसंगत माहिती देत होती. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई तिच्याभोवती फिरू लागली. मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. महिला तिचे अपहरण केल्याच्या वेळी पिंपरी परिसरात पायी चालत असल्याचे एका सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यामुळे तरुणी काहीतरी बनाव करीत असल्याची पोलिसांना खात्री झाली.
पोलिसांनी तिला 24 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट दोनच्या कार्यालयात बोलावले आणि तिच्याकडे कसून चौकशी केली. नुकतेच लग्न झाले असून तिचे सासरी मन रमत नसल्याने अपहरणाचा बनाव रचला. स्वतःच्या सोन्याच्या दोन बांगड्या, दोन अंगठ्या तिने शौचालयाच्या भांड्यात टाकल्या. मोबाइल फोन शौचालयाच्या खिडकीतून अडगळीत फेकून दिला असल्याची कबुली तिने पोलिसांना दिली.
घरातून अपहरण होणे, हा प्रकार अतिशय संवेदनशील व गंभीर असल्याने पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस रात्रंदिवस या गुन्ह्याच्या तपासासाठी काम करत होते. मात्र, खरा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी चक्क डोक्याला हात लावला. महिलेकडून दागिने आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे.