सोनई – उन्हाच्या वाढत्या पाऱ्याबरोबर तालुक्यात रसवंतीगृह सुरू झाली आहे. होळी झाल्यानंतर सूर्याचा पारा वाढू लागल्याने सूर्य उगवल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत उकाडा असल्यामुळे सर्वजण हैराण असतानाच अशातच लोकसभा निवडणुकीमुळे राजकारणाचा पारादेखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर रसवंतीगृहे आणि थंड पेय यांची दुकाने सजू लागली आहे.
नेवासा तालुक्यामध्ये सुमारे 100 ते 150 रसवंती दुकाने चालू झाली आहेत. नगर-औरंगाबाद महामार्गाबरोबर घोडेगाव- शनिशिंगणापूर- राहुरी मार्गांवर सोनईचा पुढे वंजारवाडी परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांचे रहदारीचे प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणी रसवंतीगृह सुरू झालेले आहेत. उसाचा रस म्हटले की, पूर्वी लाकडी चरक आणि घुंगरू बांधलेले बैल यांचा आवाज येत असे. आता बैलांची जागा मशीनने घेतली आहे. त्यातच लाकडी चरकांच्या रसाला चांगली चव असल्याने उसाच्या रसाला जास्त मागणी आहे.
अत्यंत छोट्या आकारात आलेली ही रसवंती यंत्रे आणि त्याच्या बाजूला स्पीकर वाजत असलेल्या घुंगरांचे आवाज वातावरण निर्मिती करत असताना उसाचे वाढलेले भाव आणि बर्फाचे वाढलेले भाव, यामुळे पूर्वीसारखा नफा राहिला नाही, असे रसवंती चालकांचे म्हणणे आहे.
सोनईमध्ये पूर्वी चार ते पाच बर्फाचे कारखाने होते. सोनई परिसराला सुमारे 35 ते 40 बर्फाच्या लाद्या लागत असेल, परंतु आता थंड पाण्याचे जार उपलब्ध होत असल्याने बर्फांचे कारखाने बंद पडले आहे. केवळ एकच बर्फाचा कारखाना चालू आहे.
ज्या सोनई शहराला पूर्वी 10 ते 20 बर्फाच्या लाद्या लागत असत, त्या शहराला आता केवळ चार बर्फाच्या लाद्या लागतात. त्यामुळे बर्फाचे भाव देखील उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साडेसातशे ते आठशे रुपये लादीपर्यंत गेले आहेत. यावर्षी उसाचे भाव देखील आठ हजार रुपये टनाप्रमाणे महाग झाल्याचे बर्फ विक्रेते पटेल यांनी सांगितले.ग्रामीण भागात मिळणाऱ्या बर्फाच्या लाद्याचे पाणी चांगले असते का, हा प्रश्न ग्राहकांना असतो. त्यामुळे अनेक जण गरम होत असतानाही उसाचा रस बिना बर्फाचा द्या, अशी मागणी करतात, असे रसवंती चालक दराडे यांनी सांगितले.
लिंबाचे भाव वाढले
उसाच्या रसाबरोबर लिंबू घ्यावेच पण सध्या 120 रुपये ते दीडशे रुपये किलो लिंबू महाग झाले आहे. नामांकित कंपन्यांची शीतपेय उपलब्ध असताना ऊसाचा रस आणि मसाला ताक यांना जास्त मागणी आहे