नवी दिल्ली – बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या हत्या आणि अपहरणाच्या निषेधार्थ स्थानिक कार्यकर्त्यांनी इस्लामाबादवर काढलेल्या मोर्च्याला पोलिसांनी अडवले आहे. आज सकाळी हा मोर्चा इस्लामाबादमध्ये पोचणार होता. त्यापूर्वीच राजधानीच्या सीमेजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवले.
कार्यकर्त्यांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे देखील मारले आहेत. या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेल्या महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. तर पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व कार्यकर्त्यांना अटक केली गेली असून महिला आणि बालकांना वेगळ्या तुरुंगात हलवण्यात आले आहे.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा बलुच व्हॉइस असोसिएशन या बलुच कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या संघटनेने निषेध केला आहे. बलुचिस्तानमध्ये होणाऱ्या न्यायबाह्य हत्या आणि अपहरणांना पाकिस्तान सरकारला उत्तरदायी रहावेच लागेल ,असे या संघटनेचे अध्यक्ष मुनीर मंगल यांनी म्हटले आहे. पाकिस्तान सुरक्षा दलांकडूनच बलुचवासियांवर अत्याचार केले जात आहेत. आजचा लाठीमार हे त्याचेच उदाहरण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारकडून बलुचिस्तानला दुजाभाव…
बलुचिस्तानमधील शेकडो कार्यकर्त्यांचे गेल्या काही वर्षांमध्ये अपहरण केले गेले आहे. अनेक नेत्यांच्या हत्याही झाल्या आहेत. चिनी कंपन्यांच्या कंत्राटदारांमुळे बलुचिस्तानमधील रोजगार बुडाला आहे. स्थानिक खनिज संपत्तीचे बेकायदेशीर आणि बेसुमार उत्खनन केले जात आहे. पाकिस्तान सरकारकडून बलुचिस्तानबाबत नेहमीच दुजाभाव केला जातो आहे, अशी बलुचवासियांची तक्रार आहे.