कराड -शिवसेना खासदार संजय राऊत यांची वाचाळ बडबड महाराष्ट्रभर सुरू आहे. गत आठ दिवसांपूर्वी त्यांनी विधीमंडळासह निवडणूक आयोगाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी करणार असून मी मंत्री झालो, ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. मात्र, उध्दव ठाकरे यांनी खा. राऊत यांना जवळ केल्यामुळेच शिवसेनेतील इतर आमदार नाराज होऊन बाहेर पडले. उध्दव ठाकरे यांनी राऊत यांच्या जास्त आहारी जाऊ नये. राऊतांच्या बेताल बडबडीमुळे पक्षाची हानी झाली आहे, असे मत उत्पादन शुल्क तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील, शिवसेनेच शहरप्रमुख राजेंद्र माने यांची उपस्थिती होती. मंत्री देसाई म्हणाले, आमच्या जीवावरच संजय राऊत हे खासदार झाले आहेत. मी स्वतः तीन वेळा अनुक्रमे 7 हजार, 14 हजार आणि 18 हजार मतांनी निवडून आलो आहे. 4 लाख मतदारांचे प्रतिनिधीत्व आम्ही करत आहोत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकही न जिंकलेल्या संजय राऊत यांनी आमच्यामुळे मिळालेली खासदारकीचा राजीनामा देऊन निवडून येऊन दखावावे; असे त्यांना मी खुले आव्हान देतो.
आम्ही आजही उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविषयी आदरपूर्वक उच्चार करतो. मात्र, संजय राऊत सातत्याने असंसदीय आणि वादग्रस्त भाषेचा वापर करून टिका करतात, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही. तेव्हा, उध्दव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दूरच ठेवलेले बरे. यातच त्यांचे हित आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
संजय राऊत यांचा सध्या दौरा सुरू असून त्यांच्या नियोजित मेळाव्यांना किती प्रतिसाद मिळतो, हे जनता पहात आहे. आम्ही रस्त्यावर सहज जरी उभे राहिले, तर त्यांच्या मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी आमच्या सभोवती जमते, असे सांगून देसाई म्हणाले, विधीमंडळ तसेच निवडणूक आयोगाबाबत राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.