नवी दिल्ली: करोनाच्या साथीमुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दिल्ली आणि मुंबईसह देशातील पाच प्रमुख शहरांमधील हवेचे प्रदूषण झपाट्याने घटले आहे. यामुळे देशभरातील 630 अकाली मृत्यूही टाळले गेले असावेत.
आरोग्याच्या कारणासाठी खर्च होऊ शकणाऱ्या 690 दशलक्ष डॉलरची बचतही लॉकडाऊनमुळे झाली आहे, असे एका अभ्यासाद्वारे निष्पन्न झाले आहे.
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सर्व्हेसह काही संशोधन संस्थांमधील संशोधकांनी देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या पाच शहरांमध्ये लॉकडाऊनच्या काळात वाहनांच्या उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या “पीएम 2.5′ या हानिकारक घटकाच्या प्रमाणाचा आढावा घेण्यात आला आहे.
जर्नल सस्टेनेबल सिटीज ऍन्ड सोसायटी या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
25 मार्चपर्यंत “पीएम 2.5’च्या प्रमाणाची तुलना 11 मे पर्यंतच्या प्रमाणाशी करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षात याच 5 शहरातील प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांनंतर कमी झालेल्या “पीएम-2.5’च्या प्रमाणाचाही विचार करण्यात आला.
या पाच शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण 24 ते 32 टक्क्यांपर्यंत कमी झाले, असे सर्व्हे विद्यापीठातील अभ्यासाचे सहलेखक प्रशांत कुमार म्हणाले.