नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा चिंताजनक आहे. इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मृत्यूदर वाढल्याचे दिसून येत आहे. मे 2021 या महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद केली गेली आहे. 1.14 लाख लोकांनी करोनामुळे जीव गमावला आहे.
मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 58,431 जणांचा म्ृत्यू झाला. तेव्हा मृत्यूदर 1.06 टक्के इतका होता. मात्र पुढच्या 14 दिवसात म्हणजे 16 मे ते 29 मे दरम्यान हा मृत्यूदर 1.73 टक्के नोंदवला गेला आहे. या कालावधीत 55,688 जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यात दर दिवसाला 3 हजार 935 जणांचा मृत्यू झाल्याचं या आकडेवारीवरून समोर येत आहे. देशातील आतापर्यंतचा मृत्यूदर 1.17 टक्के इतका आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूदरही आटोक्यात येईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने मृत्यूदरही कमी होईल असं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरण मोहीम आणखी वेगाने वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
पाच महिन्यातील मृत्यूदर (टक्के)
जानेवारी- 1.15 टक्के
फेब्रुवारी- 0.78 टक्के
मार्च- 0.52 टक्के
एप्रिल-0.70 टक्के
मे- 1.31 टक्के