लाखणगाव, (पुणे) – आंबेगाव तालुक्यात थंडी जाणवू लागल्याने विविध गावांतील नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. मान्सून माघारी परतला असून, आता तालुक्यात सर्वत्र थंडीची लाट जाणवू लागली आहे. ल
राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या माघारी मान्सूनच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या वर्षीचा पाऊस आता संपला असून, सकाळच्या वेळी बोचरी थंडी जाणवू लागली आहे, त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. यावर्षी मोठ्या स्वरुपात पाऊस झाल्याने थंडीही तितक्याच अधिक प्रमाणात पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील काळात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या कालखंडात थंडीचा कडाका राहील, असा हवामानाचा अंदाज आहे.
सध्या करोनाची साथ काही प्रमाणात कमी झाली असली तरीही थंडी वाढल्यामुळे करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू शकते, त्यामुळे थंडीमध्ये नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत मंचर येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. भूषण साळी यांनी व्यक्त केले आहे.