पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) – “इंडस्ट्रिअल हब’ म्हणून चाकण एमआयडीसीची ओळख आहे. असे असले तरी येथील येथील उद्योजक वर्ग विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट लावायची कुणी आणि कशी? त्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही. व्यवसायाकडे लक्ष पुरवायचे की पायाभूत सुविधांकडे? या द्विधा चिंतेत उद्योजक सापडला आहे. याबाबत चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड यांची चिंचवड कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यापुढे उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच त्यांनी वाचला. मुख्यत्वे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमचा निकालात काढावा, अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी संघटनेचे संचालक शांताराम ताम्हाणे, संघटनेचे इतर पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही पायाभूत सोयी-सुविधा नसताना लघु-मध्यम उद्योजकांनी बॅंकाकडून कर्ज तर, काहींनी पदरमोड करून मोठ्या हिमतीने चाकण एमआयडीसी परिसरात उद्योगधंदे सुरू केलेले आहेत. त्यासाठी काहींनी चिखली, तळवडे नॉन इंडस्ट्रियल भागातील त्यांचे सुरळीत असणारे उद्योगधंदे बंद केले. चाकण एमआयडीसीत जागा घेऊन त्यांनी उद्योगांचे स्थलांतर केले. उद्योजकच एमआयडीसीकडे नियमितपणे कर भरतात. मात्र, उद्योगांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत.
कंपन्यांमधील घनकचऱ्याचे रोजच्या रोज ढीग साचत आहेत. त्याची विल्हेवाट कशी लावायची? या विवंचनेत उद्योजक अडकले आहेत. येथील ग्रामपंचायती तो कचरा स्वीकारायला तयार नाहीत. एमआयडीसी हद्दीबाहेरील आस्थापना रात्री-अपरात्री परिसरात कचरा टाकून जातात. त्याचे खापरही येथील उद्योजकांवरच फुटतेय. ग्रामपंचायती तो कचरा जाळतात. त्यातून प्रदूषण वाढीस लागतेय. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एमआयडीसी परिसरातील समस्यांकडे आपण जातीने लक्ष पुरवावे. उद्योजकांना उद्योगास पोषक वातावरण निर्मितीसाठी सहकार्य करावे, असे जयदेव अक्कलकोटे यांनी म्हटले आहे.
चाकण एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड यांनी चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.