केंदुर (पुणे) – मुखई (ता. शिरूर) येथील नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि शिवसेना नेत्या, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पालांडे यांच्या स्वाभिमानी गावकरी पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीत या मातब्बरांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर पलांडेंसह इतर प्रमुख मंडळींनी एकत्र येत श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडीने सहा जागा मिळवल्या आहेत.
दरम्यान, वॉर्ड एक मधील महेंद्र शानुर काळे, वॉर्ड तीन मधून संगीता रमेश पलांडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी महेंद्र काळे हे श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या गटाला मिळाले तर संगीता पलांडे या स्वाभिमानी गावकरी पॅनेलकडे जाऊन मिळाल्या. त्यामुळे दोन्ही गटाकडे एक एक बिनविरोध सदस्य निवडून आलेले होते, तर उर्वरित सात जागांसाठी निवडणूक झाली.
त्यामध्ये माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि जयश्री पलांडे यांच्या स्वाभिमानी गावकरी पॅनेलच्या माध्यमातून बिहार विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडितराव पलांडे यांचे पुतणे सुमित पलांडे यांनी विजय मिळवत गावच्या राजकारणात प्रवेश केला. तर माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे यांचा राजकारणातला नावलौकिक तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आहे, मात्र या मतब्बरांना घोडगंगा कारखान्याचे तज्ज्ञ संचालक सुरेश रामचंद्र पलांडे, माजी सरपंच सुरेश रामराव पलांडे, अतुल प्रल्हाद धुमाळ, सुभाष पलांडे, सुदाम थोरवे आणि सचिन पलांडे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत रोखले आहे. त्यामुळे गावच्या राजकारणात या मातब्बर नेत्यांची पीछेहाट झालेली पाहायला मिळाली.
- विजयी उमेदवार-
श्री काळभैरवनाथ ग्रामविकास आघाडी –
सोनल पलांडे, संयोगीता पलांडे, वर्षा रामगुडे, ज्योती पलांडे, रमेश पलांडे, महेंद्र काळे (बिनविरोध)
स्वाभिमानी गावकरी पॅनल-
सुमित पलांडे, सुनीता हिरवे, संगीता पलांडे (बिनविरोध).