न्यूयॉर्क/टोरोंटो – कॅनडा-अमेरिका सीमेवर बर्फात गारठून मृत्यू झालेल्या भारतीयांची ओळख पटली आहे. हे सर्व जण एकाच भारतीय कुटुंबाचे सदस्य असून ते गांधीनगरमधील दिनगुचा गावातील रहिवाशी आहेत, अशी माहिती शुक्रवारी सकाळी अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांनी दिली. मरण पावलेले चारही जण गुजराती भाषिक होते, असे अमेरिकेच्या प्रतिनिधीने न्यायालयात यापूर्वीच सांगितले होते.
हे कुटुंब 19 जानेवारी रोजी कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर असणाऱ्या मानितोबा प्रांतामधून बेकायदेशीररित्या देशांच्या सीमा ओलांडून अमेरिकेच्या हद्दीत प्रवेश करीत होते, असा आरोप आहे. हे सर्वजण एका गटाने कॅनडातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. यातील अन्य सात जणांना अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या पत्रकानुकास मरण पावलेल्यांमध्ये जगदीश पटेल (39) त्यांची पत्नी वैशाली पटेल (37) या दोघांबरोबरच त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. 11 वर्षांची विहांगी आणि तीन वर्षाच्या धार्मिक पटेलचाही थंडीने गारठून मृत्यू झाला.
जगदीश हे एक शिक्षक होते. मात्र नंतर ते कालोल शहरामध्ये उपजिविकेसाठी अन्य उद्योगही करत होते. गावामध्ये जगदीशच्या वडीलांच्या नावे एक घर आहे. मात्र जगदीशचे वडील बलदेव पटेल हे सुद्धा गाव सोडून गेल्यापासून हे घर बंदच आहे. पर्यटक व्हिजाच्या आधारे जगदीश आपल्या पत्नी आणि दोन मुलांसहीत 15 दिवसांपूर्वी कॅनडाला गेला होता.
या घटनेबद्दल जगदीश यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आल्याचे भारतीय उच्चायुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे. यासंदर्भात पटेल कुटुंबाला सर्व ते सहकार्य केले जात असल्याचेही सांगण्यात आले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याच गावातून आणखी तीन ते चार कुटुंबे बेपत्ता आहेत. याप्रकरणी अमेरिकेतील गृहखात्याचे विशेष अधिकारी जॉन डी. स्टॅनले यांनी मिनेसोटा न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाशी संबंधित भारतीय हे गुजराती भाषिक असून त्यांना इंग्रजी फारसे समजत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.