पुणे : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा खुनाच्या गुन्हयात बदलू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी विहीरीमध्ये प्रेत तरंगत असताना आढळले. या घटनेनंतर मयतेच्या सावत्र आई यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४, ५०६, सह ३४ अन्वये पती, सासु व दीर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला.
या गुन्हयाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना डॉक्टर यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे वकिलांमार्फत सदरचा गुन्हा हा आत्महत्येचा नसून खुनाचा गुन्हा असल्याबाबत व खून केले प्रकरणी भा.दं. वि. कलम ३०२ चा कलम वाढ करणेकामी अर्ज केला. या अर्जावर सत्र न्यायालयान ३०२ अन्वये कलम लावणेबाबत आदेश पारित केले. या आदेशाविरूद्ध आरोपी नामे गुरूदास बाळासाहेब राऊत व इतर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. प्रताप परदेशी व अॅड. अभिषेक अवचट मार्फत दाद मागितली.
उच्च न्यायालयाने वैदयकीय अधिकारी यांची साक्ष व इतर साक्षीदारांचे जाब-जबाब यांचे आधारे सदर प्रकरणात कलम ३०२ म्हणजेच खून केल्याचे आरोप लावण्याइतपत पुरावा उपलब्ध नाही, असा आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून सत्र न्यायालय, पुणे यांनी केलेले खुनाच्या गुन्हयाचे कलम रद्द केले.