बहुजन हक्क परिषदेच्या हालचाली सुरू
पुणे- पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनी पूरग्रस्त भागातील कामकाज उरकून आल्यानंतर सासवड येथील आपल्या कार्यालयाची गोमूत्र शिंपडून साफसफाई केल्याप्रकरणाची दखल राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने घ्यावी, याकरीता बहुजन हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीच्या अहवालानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून संबंधीत मंत्रालयाकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अन्य अधिकारी, अभियंते यांच्या प्रमाणेच पुरंदरचे गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांनाही आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी सांगली, कोल्हापुरात पाठविण्यात आले होते. परंतु, टोणपे यांनी सासवड येथील आपल्या कार्यालयात अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या खुर्चीवर बसून काम करू नये, कार्यालयाचा वापर करू नये, असे टाणपे यांच्याकडून संबंधीत अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यास सांगितले जात होते. याबाबती तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांना सदर कार्यालया वापता आले. परंतु, टोणपे हे परत आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयाची सफाई गोमूत्र शिंपडून केल्याने हे प्रकरण चिखळले. याची चौकशी करण्याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या 15 दिवसांत याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
यामुळे सदर अहवाल आल्यानंतर याबाबतची तक्रार राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडेही करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. आपले स्वतःचे अधिकार आणि दुसऱ्याचे अधिकार यात अलीकडे गल्लत होत आहे. त्यामुळे, इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. मानवी मूल्यांचे, मानवी अधिकारांचे हनन याही प्रकरणात झाले आहे. सामाजिक जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने वैयक्तिक जबाबदारी विसरलेली आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. चंगळवादी विचारसरणी मर्यादेपलीकडे जात आहे. यातून राष्ट्रीय मानवाधिकार गमावला जात आहे. गोमुत्र शिंपडून कार्यालय स्वच्छ करण्याच्या प्रकरणात हेच दिसून येत असल्याने याबाबतची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे बहुजन हक्क परिषदेकडून सांगितले जात आहे.
- पुरंदरचे गटविकास अधिकाऱ्यांनी गोमूत्र शिंपडून साफसफाईच्या प्रकरणी चौकशी केली जात असून याबाबतचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. संबंधीत अतिरिक्त गटविकास अधिकाऱ्यांशीही याबाबत बोलणे केले जात असून चौकशी अंती दोषी आढळणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.
– उदय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे