- पीएमपीचे चालक नाराज ः नवीन जबाबदारीमुळे होतोय मानसिक त्रास
पिंपरी – पाच महिन्यानंतर पीएमपी सुरू झाल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील केवळ 25 टक्केच बस रस्त्यांवर धावत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या बस आता रस्त्यावर धावत असताना अनेकवेळा बंद पडत आहेत. या ब्रेकडाऊनची जबाबदारी चालक आणि कार्यशाळा कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. यामुळे पीएमपी चालक वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्च पासून टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पुणे परिवहन महामंडळाची (पीएमपी) प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, टप्प्या-टप्प्याने टाळेबंदीच्या अटी शिथिल केल्या जात असल्याने पीएमपी प्रशासनाने शहरातील सामान्य नागरिकांसाठी 25 टक्के बसेसचे संचलन 3 सप्टेंबर पासून सुरु केले.
यात 421 गाड्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 191 मार्गावर धावत आहेत. परंतु पाच महिने बस बंद असल्याने अनेक बसना तांत्रित समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे त्या रस्त्यांवर बंद पडत आहेत. गाड्यांच्या वाढत्या ब्रेकडाऊनमुळे पीएमपी प्रशासनाची बदनामी होत असल्याने पीएमपी प्रशासनाने याबाबतची जबाबदारी संबंधित आगारातील कार्यशाळा कर्मचारी, बसचे चालक यांच्यावर टाकली आहे.
यामुळे चालक नाराज असून आम्ही गाड्या रस्त्यावर चालवायच्या की, गाड्या सुधारायच्या? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. यामुळे मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चालकांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले. याबाबत येत्या काळात शंभर टक्के गाड्यांचे संचालन सुरु झाल्यावर हा नियम पीएमपी प्रशासन कायम ठेवणार आहे का हे बघणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.
जुन्या गाड्या दिल्या
याबाबत दैनिक “प्रभात’ने पीएमपी चालकांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या हातात जुन्या गाड्या दिल्या जातात. त्यामुळे गाड्या रस्त्यात बंद पडतात. आम्ही आमची ड्यूटी करायची की, गाड्यांची देखभाल? अधिकाऱ्यांचे अपयश लपवण्यासाठी आम्हांवर ही जबाबदारी टाकत पीएमपी प्रशासन अन्याय करत आहे.