रांजणगाव गणपती – रांजणगाव -वाघाळे रस्त्यावर दि. 14 जानेवारी रोजी झालेल्या अपघातात दोन युवकांचा कठडे नसल्यामुळे चारचाकी गाडी कालव्यात पडून जागीच मृत्यू झाला होता. तरीही येथील चासकमानच्या कालव्यावरील पुलाला अद्याप कठडे बसवण्यात आलेले नाही. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यां विषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रांजणगाव-वाघाळे रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. मात्र या रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेमधून पिंपरी दुमाला ते वाघाळे असे पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार ये-जा करत असतात. मात्र या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी झालेला विलंब, पाटबंधारे प्रशासनाचे पुलावरील कठड्यांकडे होणारे दुर्लक्ष व जुने कठडे चोरून नेण्याची नागरिकांची मानसिकता यामुळे या ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या चासकमान कालव्यावरील कठडे बसवावे, अशी मागणी वाघाळे, पिंपरी-दुमाला परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. रांजणगाव रस्त्यावरून पाबळ, कान्हुर मेसाई, खैरेनगर, चिंचोली मोराची, शिंगाडवाडी, वरुडे या गावातील नागरीक रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी तातडीने कठडे बसविण्याची मागणी होत आहे.