- केजूदेवी बंधारा येथील स्थिती : बोटीही अडकतात जलपर्णीमध्ये
पिंपरी – पवना नदीपात्रात थेरगावपासून वाल्हेकरवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. यामुळे केजूदेवी बंधारा येथे पर्यटकांना आर्कषित करणारे नौकानयनही या जलपर्णीच्या विळख्यात अडकले आहे.
केजूदेवी बंधारा येथे सशुल्क बोटींगची सुविधा उपलब्ध आहे. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्यामुळे येथील बोटीही जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहेत. त्यामुळे काही फूट अंतरही या बोटींना कापता येणार नाही. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सायंकाळच्या वेळी उद्याने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान एवढा मोठा काळ निघून गेलेला असतानाही येथील जलपर्णी हटविण्यात आली नाही.
प्रदूषित पाण्यात जलपर्णी मोठ्या वेगाने वाढते. सध्या थेरगाव येथील बंधाऱ्यापासून ते वाल्हेकरवाडी पर्यंत पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे नदीतील पाण्याचा हवेशी संपर्क जवळपास तुटल्यासारखाच आहे. पाण्याचा हवेशी संपर्क येत नसल्याने नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत अल्प झाले आहे. याचा थेट परिणाम नदीतील जलचरांवर होत आहे.
शहरी भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नदीत मिसळले जाते. जलपर्णीमुळे नदीतील पाण्याचा हवेशी संपर्क येत नाही. त्यामुळे नदीतील पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. याचा त्रास नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. याशिवाय जलपर्णीमुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फक्त सायंकाळीच नव्हे तर दिवसाही मच्छरांचा त्रास होत असून त्यातून डेंग्यू मलेरिया अशा आजारांना एकप्रकारे निमंत्रणच मिळत आहे.
पावसाच्या कामाचे बिल घेतात ठेकेदार
दरवर्षी महापालिका नदीतील जलपर्णी काढण्याचा ठेका देते. संपूर्ण उन्हाळा जलपर्णी नदीपात्र व्यापून तरंगत असते. ठेकेदार कुठेतरी जलपर्णी काढत असल्याचा दिखावा करतात. परंतु त्यांना प्रतीक्षा मोठ्या पावसाची असते. मोठा पाऊस आला की पाण्याच्या वेगाने जलपर्णी वाहून जाते. जलपर्णी असतानाचा फोटो आणि पावसामुळे जलपर्णी वाहून गेल्यानंतरचा फोटो देऊन पूर्ण बिल ठेकेदार घशात घालतात, असा आजवरचा नागरिकांचा अनुभव आहे. पावसाच्या कामाचे बिल ठेकेदार घेत असल्याचा आरोप वारंवार पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. तरी देखील या व्यवस्थेत अद्याप कोणताही बदल झालेला दिसत नाही. यामुळे यंदा तरी महापालिकेने ठेकेदारांकडून लवकरात लवकर जलपर्णी काढून घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
मद्यपींचा अड्डा
थेरगाव येथून येणारे काही युवक केजूदेवी बंधारा ओलांडून चिंचवडच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये जाऊन मद्यपान करतात. अशा ठिकाणी गस्त घालण्यासाठी वाहनही जाऊ शकत नाही. त्यामुळे या मद्यपींवर कारवाई होत नसल्याने याचा पर्यटकांना त्रास होत आहे.