सातारा -शहराच्या पश्चिम भागात गेले दोन महिने होत असलेल्या दूषित आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतापलेल्या महिलांनी मनामती चौकात बुधवारी दुपारी थाळीनाद आंदोलन करून पालिका प्रशासनाचा निषेध केला. यावेळी महिलांनी माजी नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वठारे यांना निवेदन दिले. पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास राजवाडा येथून मोर्चा काढणार असल्याचा इशारा महिलांनी दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या पश्चिम भागातील मंगळवार पेठ, ढोणे कॉलनी, मांढरे आळीसह इतर भागांना दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत तक्रारी केल्यानंतर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने साठवण टाक्यांची स्वच्छता केली. त्यानंतरही दूषित पाणीपुरवठा सुरुच राहिला. अनेक तक्रारी करुनही स्वच्छ पाणी मिळत नसल्याने महिलांनी माजी नगरसेवक रवींद्र ढोणे यांच्या नेतृत्वाखाली मनामती चौकात बुधवारी दुपारी थाळीनाद आंदोलन केले.
त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध करत, पाणीप्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर अभियंता शहाजी वठारे हे मनामती चौकात आले. त्यावेळी महिलांनी बाटल्यांमधून आणलेले दूषित पाणी दाखवून, वठारे यांना काही प्रश्न विचारले. महिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, दूषित पाणीपुरवठ्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे वठारे यांनी सांगितले. ढोणे कॉलनीतील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. हा प्रकार राजकारणातून होत असून, नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे, असा आरोप ढोणे यांनी केला.