नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा निकाल उद्या येणार आहे. याबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणीदरम्यान निकालासंदर्भात टिप्पणी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्त्वाचे निकाल लागण्याचे संकेत सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
या खटल्याची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाचे न्यायाधीश 15 तारखेला निवृत्त होत असल्यामुळे याच आठवड्यात निकाल लागेल, असे बोलले जात होते. या निकालावरच महाराष्ट्राचं पुढचं राजकीय भवितव्य ठरणार आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस पाठवली. या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली. या आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे न्यायालयानेच त्यांना अपात्र करावे, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. दुसरीकडे शिंदे गटाने मात्र हा दावा फेटाळून लावला. आम्ही पक्षविरोधी कारवाई केली नाही, तर आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला.
या 16 आमदारांवर आम्ही कारवाई कशी करणार? या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधिमंडळाच्या अंतर्गत येतो, असं मत यावर सुनावणी करताना न्यायालयाने मांडले. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे यायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निर्णय अध्यक्ष घेणार का उपाध्यक्ष?
16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभेत आला तर याबाबत निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार का आमदारांना नोटीस पाठवणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ घेणार? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. 16 आमदारांना नोटीस पाठवली तेव्हा विधानसभा अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे उपाध्यक्षांनी नोटीस पाठविली, पण आता विधानसभा अध्यक्ष असताना अपात्रतेचा मुद्दा आपल्याकडेच येईल, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याप्रमाणेच महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पेच निर्माण होणार का? अध्यक्ष-उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव असेल तर मग अपात्रतेच्या सुनावणीसाठी प्रोटेम स्पीकरची निवड करण्यात येणार का? असा प्रश्नही काही घटनातज्ज्ञ विचारत आहेत.
राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल होणार आहे, त्यासंदर्भात काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या पुढील प्रमाणे –
या देशात लोकशाही आहे की नाही? विधानसभा आणि संसद संविधानानुसार चालल्या आहेत की नाही, काम करताहेत की नाही, सर्वोच्च न्यायालय, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की कोणाच्या दबावाखाली काम करतंय, याचाही फैसला उद्या लागेल.
– खासदार संजय राऊत, ठाकरे गट
सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल. या निर्णयाची संपूर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. भारताची लोकशाही अबाधित ठेवणारा निर्णय उद्या जाहीर होईल. मी सत्तासंघर्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होतो. उद्याही मी दिल्लीत असेन. मला जी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी पार पाडेन.
– अनिल देसाई, ठाकरे गटाचे नेते
सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. यामुळे सरकार राहणार की, जाणार हे उद्याच कळणार आहे. पण अनेक लोकं वेगवेगळे तर्क लावत आहे. आम्ही देखील तर्क लावत आहे की, उद्याचा निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. आम्ही सर्व कायदेशीर बाजूंचा विचार करूनच उठाव केला होता.
– संजय शिरसाठ, शिंदे गटाचे प्रवक्ते
मला कसलीही धाकधूक नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सध्याचे मुख्यमंत्री अनैतिक आणि असंवैधानिक आहेत. इतके महिने थांबलो, आता 24 तास थांबा सर्व चित्र स्पष्ट होईल.
– आदित्य ठाकरे, माजी मंत्री-ठाकरे गटाचे नेते
महाराष्ट्रात किंवा देशात कोणतंही सरकार हे बहुमताच्या आधारावर सत्तेत असतं. मी विधानसभा अध्यक्ष झाल्यावर शिंदे-फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात कोणताही निर्णय आला तरी सरकार स्थिर राहणार आहे. सरकारला कोणताही धोका नाही.
– राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष
मी जेव्हा 16 आमदारांना अपात्र केलं ते काही कुठल्याही आकसापोटी किंवा कुठल्याही अन्य कारणापोटी केलं नव्हतं. जे काही कायद्याच्या चौकटीत होतं त्या नियमानुसार मी त्यांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की न्यायदेवता मी दिलेला निर्णय मान्य करेल.
– नरहरी झिरवळ, विधीमंडळाचे उपाध्यक्ष
आमची केस मजबूत आहेत. यामुळे योग्य निकाल येईल, अशी आमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. निकाल येईलपर्यंत कोणतेही तर्कविर्तक काढणे योग्य नाही. राज्याचे सरकार हे एकदम स्थिर आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असे कोणतेही कारण नाही.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री