मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते,असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी भाजप आक्रमक झाला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आपले रोखठोक मत मांडले आहे. राज यांनी आपल्या निवास्थानी आज माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, “गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागमी राज ठाकरे यांनी केली होती. जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाचा बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगण्यासाठी वापर होतो हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायलाच हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी.
तसेच राज ठाकरे पुढे म्हणाले की… माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं. असं मत मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.