नवी दिल्ली – मणिपुरमधील मैतेई संघटना अरामबाई तेंगगोलच्या सदस्यांनी कथितपणे एका वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण केल्यामुळे मणिपुरात पुन्हा तणाव निर्माण झाला असून इम्फाळ येथे आसाम रायफल्सच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मणिपूर पोलिसांच्या ऑपरेशन विंगमध्ये तैनात असलेले अतिरिक्त पोलीस अधिक्षक अमित कुमार यांना पोलीस दल आणि सुरक्षा दलाच्या तातडीच्या कारवाईत वाचवण्यात आले आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
मंगळवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती देताना सूत्रांनी सांगितले की अरामबाई तेंगगोलशी संबंधित सदस्यांच्या एका समुहाने इम्फाळमधील वांगखेई येथे अमित कुमार यांच्या घरावर हल्ला केला होता. गाड्या चोरणाऱ्या टोळीच्या सहा सदस्यांना अमित कुमार यांनी अटक केली होती. त्यातून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता.
अटकेच्या कारवाईनंतर मीरा पैबीस या मैतेई समुदायातील महिलांच्या संघटनेने निदर्शने केली होती आणि रस्ते रोखून धरले होते. तेंगगोलच्या सशस्त्र सदस्यांनी अमित कुमार यांच्या घरात मंगळवारी तोडफोडही केली होती आणि त्यांच्या गोळीबारात चार वाहनांचे नुकसानही झाले होते.
कुमार यांचे पिता कुल्लू यांनी सांगितले की त्यांनी हल्लेखोरांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. त्यांनी आपल्या मुलाला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. कुमार त्यांच्या टीमसह दाखल झाले मात्र त्यांचे अपहरण करण्यात आले. हल्लेखोरांची संख्या खूप जास्त होती.
असे असले तरी काही तासांतच मणिपूर पोलिसांनी कारवाई करत अमित कुमार यांची सुटका केली आहे. मात्र बिघडती स्थिती ध्यानात घेत राज्य सरकारने लष्कराची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम रायफल्सच्या चार तुकड्या बोलावण्यात आल्या असून त्यांना परिसरात तैनात करण्यात आले आहे.