माले – मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा दलांच्या परतीची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. मालदीवमधील भारतीय सुरक्षा दलांना मायदेशी परत आणण्याची मुदत १० मार्च पर्यंत आहे. तोपर्यंत ही पक्रीया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मालदीवमधील एका हवाई वाहनांवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांची जबाबदारी घेण्यासाठी भारतीय नागरी पथक मालदीवला रवाना करण्यात आले आहे, असे स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
या हवाई प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन आणि देखभाल हे नागरी पथक ताब्यात घेण्यासाठी राजधानी माले येथील अड्डू येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास दाखल झाले, असे मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने एका स्थानिक संकेतस्थळाने म्हटले आहे.
सैन्य माघारीबाबत २ फेब्रुवारीला नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरिय बैठकीमध्ये या संपूर्ण प्रक्रीयेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. मालदीवमधील ३ हवाई प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा कर्मचारी हटवून त्यांच्या जागेवर नागरी दल नियुक्त केले जाणार आहे.
हे काम १० मे पर्यंत पूर्ण होईल. त्याचा पहिला टप्पा १० मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. मालदीवमधील ३ भारतीय हवाई वाहनांवर भारताचे ६८ सुरक्षा रक्षक तैनात आहेत.
या हवाई तळांवरून मानवतावादी मदत आणि आप्तकालिन वैद्यकीय सहाय्यासाठीची वाहतूक करून दिली जाते. त्यासाठी २ हेलिकॉप्टर आणि एक मालवाहू डॉर्निअर विमान उपलब्ध आहे. मालदीवचे चीन धीर्जिणे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर हे सुरक्षा कर्मचारी परत आणण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.