पिंपरी,(प्रतिनिधी) – रस्त्यातील खड्डे बुजवताना उंचवटा तयार होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, मुख्य रस्त्यावरील खोल गेलेले चेंबर समतल करावेत, उद्यानात धूम्रपान तसेच अस्वच्छता करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी,अशा वेगळ्या धाटणीच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाला जनसंवाद सभेत प्राप्त झाल्या.
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये सोमवारी (दि.11) पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण 50 तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे 10, 3, 1, 5, 4, 4, 11 आणि 12 तक्रारी वजा सूचना मांडल्या.
पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या भागात जलवाहिन्या टाकण्यात याव्यात, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, शहरामध्ये विविध ठिकाणी स्थळदर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत, शहरात सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी,
शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची वारंवार पाहणी करून नादुरुस्त असलेले कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत तसेच आवश्यकतेनुसार कॅमेर्यांची संख्या वाढवावी, अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, रस्त्यावरील बेवारस वाहने तसेच अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने हटविण्यात यावीत, अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.
अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, डॉ. अंकुश जाधव, राजेश आगळे, सिताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे उपस्थित होते.