पुणे – स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा हगणदारीमुक्त म्हणून घोषित केला. आता दुसऱ्या टप्प्यासाठीदेखील महाराष्ट्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन-ओडीएफ प्लस संकल्पनेंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्याची निवड केल्याचे पत्र सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना पाठवले.
या अभियानांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रकल्प उभारणीस केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या मोठ्या गावांचा समावेश असेल. त्यामुळे कचऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी त्याचबरोबर त्यामुळे पसरणारे आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
याबाबत जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने म्हणाले, शासनाकडे आराखडा पाठवला होता. त्या आराखड्यानुसार कामे केली जाणार आहेत. शासनाने या अभियानात समाविष्ट करून घेतल्याने घनकचऱ्याची कामे होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, पूर्वी शिल्लक राहिलेली शौचालयांचे कामे पूर्ण होतील.