नगर – शेवगाव शहरातील ४५ हजार नागरिक पाणीटंचाईला तोंड देत आहेत. काही भागात १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून तो ही गढूळ, गाळ, मैला मिश्रित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने शेवगावकरांचा पाण्याचा पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन देवून जिल्हाधिकार्यांना गढूळ पाण्याची बाटली दिली.
यावेळी जनशक्तीचे युवानेते पृथ्वीसिंह काकडे, राजेंद्र फलके, सुनील आव्हाड, तुकाराम विघ्ने आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी हर्षदा काकडे म्हणाल्या की, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शेवगाव शहराला वाढीव पाणीपु रवठा योजनेला २०१७ ला मंजुरी मिळाली. त्यानुसार त्याचे टेंडर होऊन ७ जून २०२३ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला. या आदेशानुसार हे काम ६ डिसेंबर २०२४ पूर्वीच पूर्ण होणे आवश्यक आहे. आज कार्यारंभ आदेश देऊन जवळपास एक वर्ष उलटून गेलेले आहे. तरीही या योजनेचे काम सुरू झालेले नाही. यात काहीतरी गौड बंगाल असल्याची शक्यता आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असून, पावसाचे कारण दाखवून काम सुरू करण्यास टाळाटाळ होऊ शकते.
तसेच ८७ कोटी २० लाख ४० हजार रकमेची वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे. या मागणीसाठी (दि.३०) रोजी शेवगाव नगरपालिका कार्यालयासमोर ‘मुक्काम ठोको आंदोलन’ शहरातील नागरिक करणार आहेत. यासाठी शेवगाव शहर नागरिक कृती समिती ठिकठिकाणी बैठका घेत जनतेची जनजागृती करत आहेत, असेही हर्षदा काकडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, शेवगाव शहर पाणी प्रश्नाबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.