– अरुणा सरनाईक
लौकिक अर्थानं पाहता मीरा वरवर साधी सरळ स्त्री वाटते. कृष्णवेडानं भारावलेली आहे. सारं जीवन कृष्णार्पण करणारी वाटते. मात्र, मीरा समजणं फार कठीण आहे.
अलीकडेच ओशोंचे “मीरा की मधुशाला’ पुस्तकं वाचण्यात आले. मीरा नव्यानं कळली! मनात विचाराचं मोहोळ गजबजून गेलं! भक्तीचं, समर्पणाचं दुसरं नावं मीरा! द्वेष, मत्सर जेलसी इर्शा, नसलेली सुंदर आरसपानी नितळ मीरा! राधेला श्यामा म्हणणारी मीरा! जी श्यामरंगात रंगून गेलेली आहे. जिला श्यामाशिवाय अस्तित्वच दुसरं नाही ती राधा! मीरा आपल्या भजनांमध्ये राधेला श्यामा याच नावाने संबोधते. निव्वळ समर्पण भाव म्हणजे मीरा. एक तरल निर्मळ आतबाहेर श्यामरंगात नटलेली जणू आकाशातील विजेची रेघ म्हणजे मीरा! कृष्णाची मीरा!
मीरा कृष्णवेडानं भारावलेली आहे. सारं जीवन कृष्णार्पण करणारी वाटते. मात्र, मीरा समजणं फार कठीण आहे. ती तर्क नाही, ज्ञान नाही, समजून घेणारा अभ्यासणारा ग्रंथ नाही, कविता नाही. काव्य नाही, वेद नाही, पुराण नाही. ती आहे एका अत्यंत सुंदर पण दर्दभरी प्रीतीची, प्रेमाची आर्त अनुभुती आहे. ती शब्दातीत आहे. असंही वाटतं जणू परमात्म्याच्या अपार भक्तीचं त्याच्याच भक्तीसाठी भक्तीनं धारणं केलेलं स्त्रीरूप आहे! तिचा श्वास प्रश्वास सारं काही कृष्णाला अर्पण आहे. जणू तो, वाहता असणारा एक भक्तीप्रवाह आहे जो प्रत्यक्ष परमेश्वराच्या हृदयातून वाहत परत त्याच्यापाशीच मिळणारा मधला प्रवाह, फक्त वाहता राहण्यामागचे निमित्त आहे. हा मधला प्रवाह म्हणजे मीरा! किंवा कृष्णापर्यंत पोचण्यासाठी आपण मीरा या भावनेचा भक्तीच्या साकवासारखा म्हणजे पुलासारखा उपयोग करू शकतो.
मीरा म्हणजे अंतर्बाह्य भक्ती. अशी भक्ती जी स्वतःला स्वतःचा विसर पाडून परमात्म्याजवळ पोचू इच्छिते. तिच्या सगळ्या जीवनाचं सार्थक फक्त कृष्ण आहे. जो जसा आहे तसा तिला तो प्रिय आहे. अगदी राधेसकट! कारण त्याच्याशिवाय ती अस्तित्वहीन आहे. त्याला ती आपला जन्मोजन्मीचा साथीदार मानते. तिच्या मते तो तिच्यापसून विलग नाही. जो तिच्या जन्मापूर्वी तिच्या सोबत होता जो मृत्यूनंतर दूर जाणार नाही असा! त्याचे तिला कधीच विस्मरण होत नाही. कारण, विस्मरण होण्यासाठी स्मरणातून ती व्यक्ती जायला हवी. कृष्ण म्हणजे ती आणि ती म्हणजे कृष्ण हे अस घट्ट समीकरण आहे. हे मीरेचे तत्त्वज्ञान माहिती असलं तरी नव्यानं उलगडलं. तिचा साथीदार जन्मोजन्मीचा सखा शाश्वत जोडीदार त्याला ती भगवान म्हणते. म्हणूनच मग राणाजीकडून विषाचा पेला ती सहज पिऊन जाते.
कारण, देहाचं नश्वरत्व तिला चांगलं ठाऊक आहे. जो आज सोबत आहे तो कालही होता, उद्याही आहेच; मग ओझ कशाचं बाळगायचं? फक्त शरीररूपी वस्त्र बदलणार आहे. इथेही पुन्हा कृष्णाचचं तत्त्वज्ञान! “वासासि जिर्णानि’ म्हणत ती विषाचा पेला सहजी पिऊन टाकते. कृष्णासारख्या श्वाश्वत साथीदारामुळे मीरा अश्वाश्वत साथी, सहिदर जे फक्त जन्मामुळे तिच्याशी जोडले गेलेले आहेत, जे तिच्या मृत्यूनंतर तिच्या सोबत राहणार नाहीत त्यांना ती दूर सारते. त्यांची साथसोबत सोडताना तिला दुःख होत नाही. यात तिचे आप्त होते, रक्ताचे नातेसंबंध होते, आई, वडील, भाऊ होते. मैत्रिणी, सख्या होत्या. सासरचं गणगोत होतं पण मीरानं यातून स्वतःला मुक्त करवलं.
ओशो अशा लौकिक नातेसंबंधाला फार छान नाव देतात. ते म्हणतात, कागदी होड्यांचे संबंध! खोलवर विचार केला तर खरंच आहे असे कागदी संबंध असतात म्हणूनच त्याला कायदेशीर नाती मानतो ती तुटतातही लवकर.
एका सहीनं संबंध जुळतात आणि एकाच सहीनं ते तुटतात देखील. आजच्या घडीला कागदी होड्यांचे संबंध ही संकल्पना शंभर टक्के सत्यात उतरलेली आहे. पावसाळ्यात प्रत्येकाने एकदा तरी पाण्यात कागदी होड्या सोडलेल्या आहेत. जी होडी स्वतःच पैलतीरावर पोचू शकत नाही, कोणाला पल्याड करू शकत नाही, ती होडी काय कामाची? तशीच नाती जी मृत्यूनंतर बरोबर येत नाहीत ती काय कामाची? मग अशा नात्यांचं ओझं का वाहायचं? आणि तुटली तर दुःख तरी का करायचं? मीरानं हे तत्त्वज्ञान किती तरी आधी जाणलं, अंगी बाणलं आणि आचरणात आणलं! तिचा कृष्णाशिवाय जगविस्तार नव्हता. आत बाहेर फक्त कृष्ण कृष्ण! अशी भावना होती म्हणूनच मीरा अजरामर ठरली! तिच्या भावना तिची पदं अविस्मरणीय ठरली.
वेद जसे अपौरुषेय आहेत, स्वयमेव आहेत; तशीचं मीरेची पद भजनं आहेत ती तिनं कुठे बसून लिहिली नसून ती उत्स्फूर्त आहेत. सहज उमटलेली आहेत. त्यांचे प्रवचन किंवा कीर्तन नाही झालीत. ती पद तिचे सहजोद्वार आहेत. मनाच्या मस्तीत, थिरकणारे या पैंजणातून आणि वीणेच्या झंकारण्यातून आपोआप ते उमललेली आहेत. त्यात अश्रू आहेत, वेदना आहेत, मिठा मिठा दर्द आहे. नाही आहे तो शिळेपणा, नाही आहे ती कृत्रिमता! सच्चेपणा आहे. कृष्णभक्तीची अपार ओढ! द्वेष नाही, राग नाही. आहे ती फक्त करुणा! मी हात जोडते, दिनरात तुला स्मरते, फक्त एकदा तरी तू माझो स्मरण कर ना रे! तुझ्या मला स्मरण करण्यानं माझी ही भावयात्रा सफल होईल, असे मीरा म्हणते. कृष्णाला ती श्याम म्हणते आणि कृष्णासोबत राधेला ती स्मरते. तिला ती श्यामा म्हणते. कारण, राधा कृष्णात समर्पित आहे. त्यांचं अद्वैत तिला मान्य आहे. तिच्या मते राधा कृष्ण आणि ती एकच आहेत!
तिचा विरह हसरा आहे. तो मुळी कृष्णाशी धरलेला रूसवा आहे. तिच्या पदात ताजेपणा, आशावाद, आर्त आहे. वाट बघण्याची ओढ आहे. ती देवाला हसत आळवते, त्याच्याशी बोलते, प्रसंगी रूसते, हा मधुराभक्तीचा प्रकार आहे. तिच्या पदात नृत्य आहे. झोपाळ्याला एक झुला द्यावा तसा आनंदाचा झुला मीरा कृष्णाला देते, तिच्या सोबत झुल्यावर कृष्ण असतो. मीरा अंर्तबाह्य उत्साही आहे, उन्मादी आहे बाह्यजगाचे विस्मरण झालेली आहे. तो तिच्याशी बोलतो खेळतो तिची छेड काढतो. हे आपल्याला तिच्या पदांवरून जाणवतं. कृष्णभक्तीच्या अपार आकर्षणानं घेतलेला तो स्त्रीजन्म आहे. दृती भगवान कृष्णाचा श्वासंप्रश्वास आहे. तिच्या शब्दांत सांगायचं झालं तर ती म्हणते, म्हारो जनम-मरन के साथी। थाने नहिं बिसरू दिन-राती।