– गौरी सरनाईक
गंधाली या नावात एक सुंदर गंधयुक्त अर्थ दडलेला आहे. गंधाली म्हणजे अत्तराची कुपी. मनालासुद्धा गंधाली म्हणता येईल. मन म्हणजे आठवणींची अत्तराची कुपीच असते ना!
मराठीत काही असे शब्द आहेत की त्या शब्दांना गंधयुक्त नाद असतो. नुसत्या त्यांच्या नावाने किंवा उच्चाराने, स्मरणाने मनुष्य स्वत:च्या तरुण वयात जातो. मन अलवार होते. जुनं काहीबाही हातातून निसटून गेलेलं आठवून जातं. तो पूर्ण काळ डोळ्यांसमोरून निघून जातो. जाता जाता सोबत आपल्याला घेऊन जातो. आज असंच काहीसं झालं. अंगणातल्या मोगऱ्यासकट कुंदा, जाई आणि सायली ही तर सगळी पावसाळी सुगंधी फुलं. मोगऱ्याच्या हातात हात घालून फुलून आलेली आहेत. किती सांगितलं त्यांना आता बहर मोगरा! तुम्ही नाही गं; पण याही स्त्रीलिंगी ना. ऐकणार तर नाहीत. फुला बायांनो आणि आपला सुगंध वातावरणात पसरवा. माझी मात्र मजा. समोरच्या दारात वेलीवर जाई, सायली फुलतात. मधल्या अंगणात मोगऱ्याच्या बरोबरीनं कुंदा फुलते. देवघरातील देवांची मजा. सगळी उन्हाळी पावसाळी सुगंधी फुलं सेवेला हजर असतात. सारं वातावरण सध्या गंधयुक्त आहे. मागच्या अंगणात यावेळी हापूसला 10 ते 12 फळं निघाली. विहिरीकडे फणसाच्या झाडावर फणसं अगदी लगडली आहेत. परवा गमतीनं सहजच म्हणाले. माझ घरं कोकण झालंय फक्त समुद्र नाही पण, तो माझ्या मनात आहे. भोवताली ही निसर्गाची गंधाली आणि मनात कोकणातला समुद्र.
मनालासुद्धा गंधाली म्हणता येईल. मन म्हणजे आठवणींची अत्तराची कुपीच असते ना! माणसाच्या मनात किती आठवणी असतात, अगदी बालपणीपासून ते आतापर्यंतच्या. खूप लोकांना विस्मरणाचा त्रास असतो. बऱ्याच आठवणी विस्मरणाच्या गर्तेत गेलेल्या असतात. माझं मात्र अजून तसं झालेलं नाहीय. उलट अगदी आजदेखील सगळ्या आठवणी, अगदी समज आल्यापासून ताज्या आहेत. त्यातील बऱ्याच आठवणी त्रासदायक आहेत. तर बोटांवर मोजण्या इतक्या आनंदाच्या आहेत. पण गंधाली मात्र नक्कीच म्हणता येईल. माणसाचं आयुष्य म्हणजे गंधाली होऊ शकते. स्वत:च्या चांगल्या असण्याचा, वागण्याचा एक आत्मीय गंध. तो प्रत्येकाला म्हणजे संबंधात येणाऱ्यांना आपण देऊ शकतो. मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक किंवा कोणीही विद्वात पंडित आपल्याला वर्तमानात राहा, असा संदेश देतात. भूतकाळ आठवू नका, भविष्यात डोकावू नका, फक्त आजचा, आताचा क्षण जगा जो आपला आहे. माझं मत यापेक्षा थोडं वेगळं आहे. भूतकाळ असतो, आपण त्याला इतिहास म्हणूया. आपल्या देशालासुद्धा सुंदर समृद्ध इतिहास पुराणकाळ, आहेच ना. त्यातील काही घटना, कथा आजही अनुकरणीय, अनुसरणीय देखील आहेत. हा आपला वारसा आहे. भलेही त्यात अपार अपमानाचे, पराजयाचे प्रसंग आहेत. पण तेही आपल्याला काही शिकण्यासाठीच असू शकतात. प्रत्येक व्यक्तीचे आपण स्वतंत्र अस्तित्व मानले तर मग भूतकाळ का नको? वाढीवरच्या वयावर ही भूतकाळातील आठवणींची गंधाली, आपलं जगणं आनंदाचं करते. या मताशी मी पूर्णत: सहमत आहे. एका ठराविक काळानंतर दु:खद आठवणींची धार बोथट होतेच ना! मग ही गंधाली का नको?
रणजीत देसाईंनी लिहिलेल्या प्रेमकथांची गंधाली आजही वाचकांना एक तरल, अलवार प्रेमयुक्त भावना जागवतेच ना? आपलं वाङ्मय समृद्ध आहे. कला, कल्पनांचा सुंदर आविष्कार आहे. दर पावसाळ्यात आकाशातल्या काळ्याभोर जलदांना (ढगांना) पाहून महाकवी कालिदासांचे मेघदूतम आठवतेच ना! ही आपल्या रम्यकाव्यकथांची गंधयुक्त गंधाली नाही का? स्वप्नवासवदत्ता आहे, उषास्वप्न आहे, किती सांगावं आणि किती नाही. माझ्या मते, मन समृद्ध असो वा नसो माणसाचा भूतकाळ हा नेहमीच गंधयुक्त असतो. त्याला इतिहास म्हणू शकतो. ज्यांना इतिहास नाही, भूतकाळ नाही, आठवणी नाही ती एक प्रकारे जीवनाची विदारकता आहे. एखाद्या संध्याकाळी अंगणातल्या पाळण्यावर बसलेली प्रौढ व्यक्ती पहा, निरखा. त्यांचे आठवणींचे ऊन-पावसाळे आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतात. निवांत वेळ, संपत आलेली संध्याकाळ आणि आठवणींची गंधाली अनुभवलेली ती प्रौढ व्यक्ती, जेव्हा देवाजवळ दिवा लावायला येते तेव्हा किती काळाची गेलेल्या दिवसांची वजाबाकी करूनही प्रसन्न दिसते. पुन्हा वर्तमानात येऊन अतिशय आनंदाने आपल्या रोजच्या कामाला लागते. हाही एक अनुभव मेडिटेशनचा असू शकतो. आपण जयंती, पुण्यतिथी साजरी करतो. महान संत, व्यक्तींना आपल्या मनात आदराचं स्थान देतो. नित्यस्मरण करतो. त्यांच्या आवडीचे पदार्थ करताना, खाताना, त्यांच्या आठवणी काढतो.
मग का विसरायचा भूतकाळ? त्यांच्यात गुंतून राहू नका ते योग्य नाही, हा सल्ला किती योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. मात्र तो सुखकर आहे हे नक्कीच! दासबोध हे गंधालीतील मनोवेधक चिरकाल टिकलेले अत्तराचे तुषारच आहे ना! प्रत्येक जण आपल्या आठवणींची अत्तराची कुपी आपल्या मनात कायम जपत असतो. मृगाच्या पोटातील कस्तुरीसारख्या फक्त आपल्याला आनंद देणाऱ्या आठवणी! या आपल्या फक्त आपल्यासाठीच असतात. त्या कोणाशी वाटता येत नाहीत की सांगता येत नाहीत. रेशमी कपड्यांच्या अस्तरासारख्या! अस्तर जसं दिसत नाही, पण एक आपलेपणाची ऊब देतं, आपलं अंग दिसू देत नाही. तशाच या गंधयुक्त आठवणी कोणाला दिसत नाहीत. पण आपल्याला प्रेमाची, आपुलकीची ऊब देतात.
म्हणूनच मी भूतकाळाला विसरू पाहात नाही. तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनवा आणि बघा तुमचं व्यक्तिमत्त्व कसं बहरून येतं. आपण म्हणतो त्यांचे व्यक्तिमत्त्व अनुभवानं समृद्ध आहे. त्यांच्याकडे पाहिले की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. सर्व समस्यांवर उपाय मिळतात. कारण ते अनुभवी आहेत. मी तर म्हणेन त्यांची गंधाली उत्तम आहे त्यांचा भूतकाळ समृद्ध आहे आणि म्हणूनच त्यांच्या जवळ सर्व प्रश्नांची उत्तर, सर्व समस्यांवर उपाय मिळतील, कारण ते अनुभवी आहेत. स्वामीकार रणजीत देसाईंनी जी प्रेमकथांची गंधाली आपल्यासमोर दिली तिचे महत्त्च न मोजता येण्यासारखे आहे. आज कित्येक वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रेमकथा आजही लोकांना प्रेमात पाडतात. मग बाजीराव-मस्तानी, जोधा-अकबर सारखे चित्रपट लोकांना भुरळ घालतात. आपल्याकडे अशा कथांच्या असंख्य अत्तराच्या कुप्या आहेत. या गंधालीला कधीच रीते होण्याचे दुर्भाग्य नाही. ती कायम भरलेली गंधयुक्त आणि न संपणारी आहे. या अत्तरांच्या कुपींचे साहित्याचा सुंगध पसरविणारे लेखक आणि त्यांच्या कथांच्या गंधाली! धन्य धन्य आहे.