– विधिषा देशपांडे
श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये आणि उपासतापासांची रेलचेल असते. श्रावणी व्रतवैकल्यातल्या आहाराच्या संदर्भाने काय करावे आणि काय करू नये याविषयी…
भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावणासारख्या व्रतवैकल्यांच्या महिन्यात उपवासही भरपूर असतात. शास्त्रांनुसार उपवास म्हणजे लंघन. लंघन याचा अर्थ पचनक्रियेस आराम देणं. यामुळे शरीरास होणारा फायदा म्हणजे पचन सुधारतं, हलकेपणा येतो आणि पर्यायानं उत्साह येतो. त्यामुळे श्रावणमासात प्रत्येकाने शरीर प्रकृतीनुसार द्रव्योपवास (दूध, ताक, सरबत) करावा किंवा फळे, भाजलेले पदार्थ- लाह्या, सातूचे पीठ, थोडे दाणे-गूळ, राजगिरा, कंदमुळे असा हलका आहार घ्यावा असे सर्वसामान्यत: सुचवले जाते. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा काळ आहे. त्यामुळे आहारविहाराची काळजी घेतलेली चांगली असे तज्ज्ञ सुचवतात. सामान्यत: श्रावणात काही पदार्थांची आपल्याकडे रेलचेल दिसते. त्याबाबत नियंत्रण नसेल तर त्रासच पदरी पडण्याची शक्यता बळावते.
अलीकडे तर उपवास म्हणजे अन्नग्रहण न करणे किंवा फराळाचे खाणे असा अर्थ घेतला जातो. उपवास म्हणजे केवळ अन्नातील बदल असे समजून या दिवशी उपवासाचे विविध तळलेले पदार्थ, भरपूर चहा-कॉफी पिणे किंवा साबुदाणा, बटाटे आणि दाणे घालून केलेल्या विविध पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे उपवासाचा हेतू अजिबात साध्य होत नाही. उलटपक्षी शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत. विशेषत: साबुदाणा आणि त्याचे पदार्थ (दाण्याचा भरपूर कूट घालून केलेले), तळलेले पदार्थ जसे वेफर्स, वडे खाऊन चुकीच्या पद्धतीनं केलेल्या उपवासामुळे उष्णता, आम्लपित्त वाढणं, पोट बिघडणं, उलट्या होणं असे त्रास होतात. मग उपवास नेमका कसा करावा, असा प्रश्न हल्ली अनेकांना पडतो. तसंच श्रावण महिना आला की बऱ्याच जणांचा हिरमोड होतो, याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे परंपरागत रीतीरिवाजांनुसार श्रावण महिन्यात मांसाहार करणे वर्ज्य ठरविण्यात आले आहे, म्हणजे या महिन्यात मांसाहार करू नये असे सांगितले जाते. काहीजण या श्रावण महिन्याकडे एक संधी म्हणूनही पाहतात. पोटाला आराम देण्याची संधी!
त्यासाठी ते आयुर्वेदाचा दाखला देतात. आयुर्वेदात श्रावण महिन्यात काही विशेष आहार करण्यास मनाई आहे. एवढेच नाही, तर शास्त्रातदेखील या महिन्यात सात्त्विक खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कारणास्तव अनेक लोक या महिन्यामध्ये लसूण, कांदा आणि मांस आणि मासे सोडून देतात. शिवाय आपल्यातल्या काहीजणांचं म्हणणं असंही असतं की, पावसाळी वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात. उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. मात्र, पावसाळ्यातील वातावरण हे दमट, ओलसर असते. त्यामुळे या ऋतूत जीवाणू आणि विषाणू तुलनेने अधिक वेगाने वाढतात. त्यामुळे पावसाळ्यातला म्हणजेच श्रावणातला मांसाहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो. म्हणून कुणी निसर्गाचे वा ऋतूबदलाचे कारण सांगत, कुणी कमकुवत रोगप्रतिकारकशक्तीचं कारण देत तर कुणी व्रतवैकल्यांची महती गात पोटावर, जिभेवर नियंत्रण ठेवण्याची संधी घेत लंघन करताना दिसतात.
श्रावणाच्या काळात आपल्या आपल्या पद्धतीने आहाराची गणितं आपण ठरवतो, पण दुसरीकडे या संदर्भाने आहारतज्ज्ञ काय सांगतात हे समजून घ्यायलाही आपण उत्सुक असतो. म्हणून श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर आहार, आरोग्य व आयुर्वेदतज्ञांनी सुचवलेले काही मौलिक सल्ले आचरणात आणता येतील. धार्मिक व्रतवैकल्य आणि उपवास यांची सांगड पूर्वीपासून घातली गेली आहे. त्यामुळे उपवास योग्य पद्धतीनं केला, तर आपल्या पचनसंस्थेलाही थोडी विश्रांती मिळण्याची शक्यता वाढते. उपवासाचा सर्वसामान्य अर्थ म्हणजे काही काळ अन्न, पाणी वर्ज्य करून राहणे होय. आरोग्याच्या दृष्टीने उपवास म्हणजे लंघन होय. उपवास ही धार्मिक आचरणातील एक शिस्त आहे. तन-मनाची शुद्धी आणि धार्मिक आचरण या दृष्टिकोनातून उपवास करणे महत्त्वाचे असते. श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो. काही जण खास करून सोमवार पाळतात. पण, हा उपवास पाळताना आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे हेही लक्षात घ्यायला हवे. श्रावणात काकडी, लाल भोपळा याची भाजी, कोशिंबीर किंवा रायतं करून खाणं हिताचं मानलं जातं. यथायोग्य पद्धतीने उपवास केल्याने पचनसंस्थेला आवश्यक विश्रांती मिळून शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास अवयव चांगल्याप्रकारे सज्ज होतात.
आयुर्वेदात वर्षा ऋतुचर्येचे वर्णन करताना लंघन करावे, कोमट पाणी प्यावे, दिवसा झोपू नये, असे काही नियम सांगितले आहेत. कडकडीत उपवास करून ऍसिडीटीला निमंत्रण अजिबात देऊ नका, असा सल्लाही अनेक तज्ज्ञ देतात. श्रावणात एकदम अतिरेकी पद्धतीने उपवास वा लंघन करण्यापेक्षा प्रत्येक महिन्यात एक दिवस पाणी, शहाळं पिऊन, फळं खाऊन लंघन केलं, तरी नियमित व सातत्यपूर्ण पद्धतीने पचनक्रियेला आराम मिळवून यथायोग्य परिणाम साधता येतो. अर्थात, असं लंघनही योग्य मार्गदर्शनाखाली करणंच योग्य. उपवास सोडताना आवर्जून पचण्यास हलके पदार्थ खावेत. उदा. भाज्यांचं सूप आणि मूगखिचडी, मऊ भात आणि मुगाचं वरण, गहू आणि मूगडाळ यांच्या भाजणीचं थालीपीठ इत्यादी. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येत नाही.