चिंबळी, (वार्ताहर) – उन्हाच्या झळा चांगल्या जाणवू लागल्या आहेत. नागरिकांना थंड पाण्याची गरज भासू लागली आहे. दर वर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात दाखल झाला असून, यासाठी लागणार्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्याने तरीही यंदा माठांच्या किमती स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मध्यम माठ 200 ते 300 तर मोठा माठ ः 300 ते 400 रुपयांना खेडच्या दक्षिण भागात दारोदारी विक्री केली जात आहे.
कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनविण्यासाठी मग्न असतात. उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात. थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणे गरिबांना आवाक्याबाहेर असल्याने तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फ्रीजचे पाणी आरोग्यास योग्य नाही तसेच मातीच्या माठात अनेक गुणधर्म असल्याने सामान्य नागरिकही फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाण्याला प्राधान्य देत असल्याने माठांना मागणी वाढली आहे.
दरम्यान, यंदा उन्हाळा जास्त कडक राहील असा अंदाज वर्तविला आहे. त्या मुळे मोठ्या प्रमाणात माठ बनविण्यात आले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ असली तरी या वर्षी भाव स्थिर असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
रंगीबेरंगी माठांना घेण्याचा नागरिकांचा कल
बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याचे मठाची जागा विविध प्रकारच्या साधनांनी घेतली. त्यामुळे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. माठातील शुद्ध पाणी आरोग्याला चांगले ठरते. दोन-तीन वर्षांपासून चिनी मातीच्या रंगीबेरंगी माठांना घेण्याचा नागरिकांचा कल वाढलेला असला तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही मातीच्या माठांना मागणीच आहे हे मात्र निश्चित!