कराड – गतवर्षी जगात साखरेला चांगला दर होता. यावेळी महाराष्ट्रातही साखरेचे उत्पादन चांगले झाले होते. मात्र, राज्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीची मोडतोड करून काटामारी करत शेतकऱ्यांचे शोषण केले. तसेच उसाला कमी दर देऊन साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचा विश्वासघातही केला, असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला.
कारखानदारांनी गतवर्षी शेतकऱ्यांचे केलेले शोषण आणि चालू गळीत हंगाम सुरू होऊनही जाहीर न केलेला ऊस दर याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी दि. 24 रोजी दिवाळीदिवशीच कराड तहसील कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने खर्डा- भाकर आंदोलन करून राज्यातील साखर कारखानदारांचा तीव्र निषेध नोंदवला. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव यांच्यासह संघटनेच्या इतर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थितीत होती.
पंजाबराव पाटील म्हणाले, ”गेल्या चार वर्षात साखरेचा वर्षाला २०० रुपयांनी भाव वाढत गेला. मात्र, याउलट दरवर्षी ऊसाचा १०० रुपयांनी भाव कमी होत गेला. याची खात्री आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाली असून शेतकऱ्यांमध्ये कारखानदारांबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे.” त्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित होऊन जोपर्यंत राज्यातील साखर कारखानदार चालू गळीत हंगामातील ऊस दर जाहीर करत नाहीत, तसेच एक रकमी एफ. आर. पी. अधिक १ हजार रुपये दर देत नाहीत; तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाला कोयता लावू नये, असे आवाहनही श्री. पाटील यांनी यावेळी केले.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, विश्वास जाधव व अन्य पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी साखर कारखानदारांच्या कारभाराविरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी कराड तालुक्यासह आसपासच्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.